अंगणवाडी कर्मचाऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अंगणवाडी कर्मचाऱयांना सरकारी कामासाठी जुंपण्यात आले आहे. असे असताना पुन्हा मतदार ओळखपत्र तयार करण्याच्या कामाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपविली गेली आहे. त्यामुळे ताण पडत असल्याने हे काम करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. हे काम इतरांकडे सोपविण्याची मागणी अंगणवाडी महिला कर्मचाऱयांनी ‘सिटू’च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱयांना भाग्यलक्ष्मी, मातृवंदना, कुपोषित मुलांना पौष्टिक आहार, गर्भवती महिलांना आहार, सहा महिने ते 3 वर्षांच्या मुलांना आहार, तीन ते सहा वर्षांच्या मुलांना शिक्षण अशी विविध कामे सोपविली आहेत. याचबरोबर आरोग्य विभागातील कामांसाठीही आमच्यावरच जबाबदारी दिली जाते. आम्ही कामे तरी किती करू, असा प्रश्नदेखील या महिलांनी निवेदनात केला आहे.
मतदार ओळखपत्राच्या कामाची जबाबदारी दिल्यानंतर राजकीय व्यक्ती, त्यांचे कार्यकर्तेदेखील आमच्यावर दडपशाही करत आहेत. इतरत्र बदली करू, अशी धमकी देत आहेत. नोकरी कशी करता ते पाहू, असे म्हणत आहेत. तेंव्हा आम्हाला हे कामच नको तसेच आमच्यावरील तणाव कमी करा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन दताना मंदा नेवगी, मीनाक्षी दासाळे, एस. पी. राजपूत, व्ही. सी. चव्हाण, एस. एस. मेंडके, एन. बी. पठाण, एस. आय. कुद्दुण्णावर, एस. एम. गावकर, पी. एम. पाटील व इतर महिला उपस्थित होत्या.