मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सवाल : जगदीश शेट्टर यांच्यावर टीकास्त्र
बेळगाव : कोरोना संसर्ग काळात बेळगाव जिल्ह्यासाठी वितरण करण्यात आलेले ऑक्सिजन हुबळी-धारवाडला नेऊन येथील नागरिकांवर अन्याय केलेल्या जगदीश शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्याला काय दिले? मात्र आता ते बेळगावला कर्मभूमी म्हणत आहेत. या जिल्ह्यातील नागरिकांना बकरा केला जात आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जगदीश शेट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शेट्टर यांनी बेळगावला काय दिले?, आकाराने मोठा असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात अधिक लोकसंख्या आहे. कोरोना काळात जिल्ह्यासाठी ऑक्सिजन वितरण करण्यात आले होते. ते त्यांनी हुबळी-धारवाडला नेले. हेच काय त्यांचे कर्म? असा सवाल त्यांनी केला आहे. जिल्हा पालकमंत्री असताना त्यांनी कोणते कार्य केले? असा सवालही उपस्थित केला आहे. हुबळी येथील नागरिकांनी त्यांना सहा वेळा निवडून दिले आहे. विरोधी पक्षनेते, मंत्री, मुख्यमंत्री, भाजप राज्याध्यक्ष, ही सर्व पदे त्यांनी उपभोगली आहेत. असे असताना हुबळी-धारवाडमधील जनतेने त्यांना बाहेर घातले आहे. आता बेळगाव ही आपली कर्मभूमी असल्याचे सांगून ते काय साध्य काय करणार आहेत? बेळगावसाठी त्यांची काय देणगी आहे? अशा परखड शब्दात मंत्री हेब्बाळकर यांनी टीका केली. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच ‘गो बॅक शेट्टर’ अभियान सुरू करण्यात आले होते. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या स्वाभीमानालाही धक्का पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले.