मागच्या लेखामधे उल्लेख केल्याप्रमाणे कुणालला आई-वडिलांनी दिलेल्या सूचना, सतत त्याच्यावर ठेवलेले लक्ष, आता तू टिन एजर झालास असे करू नको, तसे वागू नको, आमच्यावेळी हे असे नव्हते. अशा सततच्या चर्चांनी तो पुरता वैतागला होता. आपण सतत स्पॉटलाईटखाली उभे आहोत आणि कुणीतरी आपल्याला सतत न्याहाळते आहे या भावनेसोबतच या वयात शरीर-मनामध्ये होणारे बदल, मानसिक आंदोलने यामुळे त्याला अस्वस्थता येत होती. तर आपण खूप गुणी, चांगली मुलगी असे ब्रेन प्रोग्रॅमिंग असणाऱया मनालीला या वयात भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल निर्माण होणारे आकर्षण, भावनिक कल्लोळ याबाबत कुणाजवळ बोलावे आणि हे सगळे नॉर्मल आहे की आपण खूप पापी आहोत असे प्रश्न अस्वस्थ करू लागले होते. अशा गलिच्छ विचारांपेक्षा हे जीवनच नको असेही तिला वाटू लागले होते.
कुणाल आणि मनालीसारखे अनेक टिन एजर्स भेटत असतात. काही जणांना या वयातील भावनांचा आवेग कसा हाताळावा हे उमजत नाही, तर काहींच्या मनात अपराधीपणा निर्माण झालेलाही पहायला मिळतो. या वयातील मुलांमध्ये होणारे बदल, विविध कारणांनी त्यांचा स्वतःशी चाललेला झगडा हे पहायला मिळतेच परंतु अनेकदा या वयातील मुलांचे पालकही गोंधळून जातात, काहीवेळा वैतागतात.
एका टिन एजर्सची आई मला भेटायला आली होती. बोलताना म्हणाली, ‘मॅडम, घरातल्यांसोबत, इतरांसोबत जमवून घेणे परवडले. अहो, एकवेळ कामवाली बरोबरही मी जुळवून घेईन परंतु वयात आलेल्या या मुलांसोबत जमवून घेणे कर्मकठीण’ मला हसू आले. मी विचारले, ‘म्हणजे?’
‘अहो काय सांगू…कसले या मुलांचे शब्द. चिडले की म्हणणार.. चिल्ड मम्मा चिल्ड..कुल.. हे असले शब्दच शिशारी आणतात. काही सांगायला जावं तरी पंचाईत न सांगावं तरी पंचाईत…आमच्यावेळी कसे काय होते यावर गप्पा मारल्या तरी या पोरांच्या कपाळावर आठी पडते. पण या मुलांना फरक समजायला नको का, किती सोयीसुविधा आहेत यांना. तरीही यांची कुरकुर सुरुच.’
‘बरं, मला सांगा, तुमच्या सारख्या सूचनांनी काही फरक पडतो का?’ ‘छे हो, बिल्कुल नाही. उलट हल्ली माझा मुलगा थोडा लांबच पळतो. बरं असं होतं, की उद्या हा काही विचित्र वागला तर सारे बोल मलाच लावणार. म्हणे मुले म्हणजे मातीचा गोळा. आकार द्याल तसा आकार घेणार. कसलं काय. या टिन एजर्सना सांभाळणंच कठीण.’
नंतर बराच वेळ आमची यावर चर्चा झाली. अनेक गोष्टी त्यांनाही समजावून सांगाव्या लागल्या.
पालकांनीही स्वतःला विचारायला हवं की आपण मुलांशी संवाद साधत असताना सुसंवाद जोपासण्यासाठी कौशल्याने त्यांच्याशी बोलतो आहोत की सतत सूचना, चूक, बरोबर, आमच्यावेळी हे असे होते वगैरे यावर चर्चा करतो आहोत? उपदेश करतो आहोत?
माझे अनुभव, ज्ञान, समाजातील वजन हे सारं बाजूला ठेवून मला तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, तुझी मित्रमंडळी, धम्माल, गमती जमती हे सारं ऐकायला आवडेल, तुमच्याकडून काही शिकायलाही आवडेल अशी कळकळ आणि जिव्हाळा मुलांना दिसला तर ही मुले अगदी भरभरून बोलतात. या मुलांना आपले पालक कोण आहेत, ते काय करतात यापेक्षा या वयात मी कोण आहे, माझ्या मनात काय खळबळ चालली आहे हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे वाटते. आमच्यावेळी हे असे होते. आम्ही असे वागायचो वगैरे सांगायला पालकांनी सुरुवात केली तर नाईलाजाने मुले ते ऐकतात खरी परंतु त्यातून त्यांना पडणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची त्यांना आशा वाटत नाही. परिणामी मुलांची कधी चिडचिड सुरू होते तर कधी मनात विलक्षण द्वंद्व उभे राहते.
पालकांनी हेही लक्षात घ्यायला हवे की काही वेळा मुले चुकीची वागू शकतात. अशावेळी मुलांच्या भावनांशी समरस होऊन तो/ती काय म्हणतो/म्हणते आहे हे ऐकून घेणे हा अगदी सोपा उपाय आहे. परंतु त्यासाठी आधी स्वतःची निर्णय देण्याची, लेबलिंग करण्याची सवय निग्रहाने टाळावी लागते. प्रथम त्याची/तिची राग, चिंता, भीती, नैराश्य जे असेल ते प्रथम भावनिक पातळीवर समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर योग्य वेळी ‘कुणाचे काय चुकले’ यावर चर्चा करण्यापेक्षा कसे चुकले आणि अशी चूक टाळण्यासाठी काय काय करता येईल अशी भूमिका घेतली तर त्यावेळी निर्माण होणारी चिडचिड, त्रागा टाळता येईल. तू अस्साच आहेस. कधीच सुधारणार नाहीस अशी वाक्मये टाळलेलीच बरी.
काही पालक मुलाला कसलाच धक्का लागू नये. हे जग फार वाईट आहे असे म्हणत अती जपतानाही दिसतात. कोणतीही उणीव भासू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतात. परंतु एक लक्षात घ्यायला हवे की जीवनामध्ये चढउतार, आशा निराशेचे प्रसंग येत असतातच. मागितले की त्वरित मिळाले हेही थोडे टाळायला हवे. अपेक्षाभंगाचे छोटे डोस नियोजित पद्धतीने देणे, नकार देणे आणि नकार पचवायला शिकवणे हेही आवश्यक आहे.
मुलांना प्रेम जरुर द्या, आपल्या वर्तनातून चांगले संस्कार द्या परंतु त्यांना स्वावलंबन, प्रसंगी स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही द्या. आपल्या अतृप्त इच्छा, आकांक्षा, आपली आवड निवड आपण त्यांच्यावर लादत नाही ना याचा प्रामाणिक विचारही आवश्यक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी हे आपले असले तरी स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन जन्माला येत असतात हे लक्षात असू द्या. एक पालक म्हणून तुम्ही मुलांचे निश्चितच भले चिंतीत असता परंतु सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशाच घडत नसतात याचेही भान असू द्या. हे वय फक्त धोक्मयाचेच नसते तर हसायचे, खेळायचे, फिरायचे आणि खूप काही शिकायचेही असते.
पालक म्हणून मुलांशी नाते कसे असावे असे अनेक पालक विचारतात. आपल्याला सर्वांना पतंग माहिती आहे. पतंगाला जर आभाळात उंच उंच उडवायचे असेल तर मांजाला ढील देणे आवश्यक असते. मांजा घट्ट धरला तर पतंग वर वर जाणार नाही. परंतु आवश्यक ती ढील दिली तर आभाळात विहार करणारा, भरारी घेणारा पतंग त्या दोराने तुमच्याशी बांधला राहील आणि तो दोर सक्तीचा, बंधनाचा न राहता आधाराचा राहील. आपले मुलांशी असलेले नाते हे असे असावे.
या वयातील मुलांचे आवेगी वर्तन अर्थात ‘इम्पलसिव्ह बिहेव्हियर’ यासाठी काय करता येईल, या वयातील मुलांमध्ये स्वतःला थांबवण्याचे कौशल्य कसे विकसित करता येईल आणि सुजाण पालकत्वाच्या दिशेने आपलाही कसा प्रवास होईल हे जाणून घेऊया पुढच्या लेखात!
-ऍड. सुमेधा संजीव देसाई