प्रत्यक्षात 810 पोती पोलिसांकडून जप्त : 5 जणांना अटक करून कारागृहात रवानगी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दहा दिवसांपूर्वी देसूर रेल्वेस्थानकाजवळील गोदामातून 900 पोती रासायनिक खतांची चोरी झाली होती. पोलिसांनी 810 पोती खत जप्त केले असून उर्वरित 90 पोती कोठे गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
नागराज ईराण्णा पटात (वय 21, रा. हलगीमर्डी, ता. बेळगाव), पंडित कल्लाप्पा सनदी (वय 37, रा. लक्केबैल, ता. खानापूर), वसीम इस्माईल मकानदार (वय 23, रा. न्यू वंटमुरी), मंजुनाथ सोमाप्पा हामण्णावर (वय 30, रा. लक्केबैल, ता. खानापूर), गजबरअली गौसमुद्दीन जिड्डीमनी (वय 39, रा. हुदली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
23 मे रोजी देसूर रेल्वेस्थानकाजवळील गुड्सशेड गोदामातून 900 पोती रासायनिक खत चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी आरसीएफ कंपनीचे शिवाजी बाळाराम आनंदाचे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांच्या सहकाऱयांनी पाच जणांना या चोरीप्रकरणी अटक केली आहे.
900 पोत्यांची चोरी
खत चोरण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक, 810 पोती खत असा एकूण 25 लाख 93 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रासायनिक खतांची 900 पोती चोरीला गेली होती. प्रत्यक्षात 810 पोती पोलिसांनी जप्त केली आहेत. उर्वरित 90 पोती कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात असून तपास अधिकाऱयांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.