पणजी : श्रावणमास म्हणजे सणांचा महिना. श्रावणमास सुरू झाला की, विविध सणांची रेलचेल सुरू होते. या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी आपुलकी, प्रेम निर्माण करणारा सण म्हणूनही याकडे पाहिले जाते. सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. त्यामुळे नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या निसर्गमित्राला जपणे आवश्यक आहे.
नागाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित
साप म्हणजे मरण ही कल्पना लोकांना मनात इतकी खोलवर रूजली आहे की, साप म्हणताच अनेकांचे अवसान गळते. परंपरागत लोककथा, कहाण्या, गूढकथा, भ्रामक भाकडकथा आणि शास्त्राrय माहितीविषयी अज्ञान या सर्व कारणांमुळे निरूपद्रवी सापाला शत्रू ठरवून मृत्युदूत बनविले आहे. सापाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. साप डूख धरतात, सापाचे विष मंत्राने आणि काही प्रकारच्या जडीबूटीने उतरते या घातक अंधश्रद्धेपायी देशात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. आपल्या अशा अनेक अंधश्रद्धा आणि मूर्खपणामुळे सापाच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत.
नागाला गैरसमजामुळे मानले जाते शत्रू
नागाला जगातील अनेक देशांनी देवाचे स्थान दिलेले आहे. वैदिक धर्माप्रमाणे बौद्ध व जैन्य धर्मातही नागाचे स्थान मोठे आहे. परंतु यामध्ये श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धाच जास्त आहे. सापांबद्दल आपल्याकडे बऱ्याच निराधार, कपोकल्पित गोष्टी सांगितल्या जातात. खरे तर साप हा उपयुक्त असला तरी त्याला गैरसमजामुळे शत्रू ठरवून आपण मोकळे झालो आहोत.
नागाला किंवा सापाला डिवचू नका
भारतीय संस्कृतीत सापांचे धार्मिक महत्त्व मानले जाते. वस्तुत: साप हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या कृषिप्रधान देशात तो शेतकऱ्यांचा निसर्गमित्र आहे. नागपंचमीच्यानिमित्ताने केवळ त्याची पूजा न करता, केवळ साप दिसला म्हणून त्याला न मारता, त्याला जीवदान देऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करायला हवे. साप वाचविण्यासाठी प्रथम सापांबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा दूर होऊन समाज सज्ञान होणे गरजेचे आहे. साप दिसला की मारायची ही समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात साप घरापर्यंत पोहचू नये यासाठी सापांच्या लपण्याच्या व अडचणीच्या जागा कमी केल्या पाहिजेत. सरपण व गवताची साठवणूक एका उंचीवर करावी. घरांच्या खिडक्यांच्या जवळ झाडे, वेली लावू नये. अशा विविध छोट्या छोट्या उपाययोजना केल्या तर साप आपल्या घरात येणार नाही. घराच्या आणि शेतात साप दिसल्यास त्याला डिवचू नका.
भीती काढा, सर्पांचे संवर्धन करा
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पांविषयी असलेली भीती काढून टाका. सर्पांच्या वैज्ञानिक माहितीची देवाण घेवाण करा. सर्पांच्या संख्येची स्थिती फारशी समाधानकार नाही. यासाठी त्यांचे जतन, संवर्धन करायला हवे. विनाकारण सर्पांना मारू नये, ते शेतीसाठी वरदान आहेत. नाग, घोणस, मण्यार हे साप अत्यंत विषारी आहेत. भारतात आढळणारे बहुतांश साप हे बिनविषारी आहेत. पण, जागरूकता नसल्यामुळे भीतीपोटी या निष्पाप जीवांची अनावधानाने हत्या होते. केवळ नागपंचमीच्या दिवशीच नाही तर इतर दिवशीही निष्पाप जीवांना जपणे गरजेचे आहे. कारण, सापांच्या काही जाती आता नामशेष झाल्या आहेत. यामुळेच त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.