उलपे मळ्यातील विक्रमवीर मित्र मंडळाचा शहरातील पहिला स्तुत्य उपक्रम
कसबा बावडा/प्रतिनिधी
समाजातील रूढी परंपरेच्या घट्ट वेढ्यातून बाहेर येऊन विधवा महिलांना इतरांप्रमाणे सणासुदीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी उलपे मळ्यातील विक्रमवीर मित्र मंडळाने आपल्या गणपतीची आरती भागातील विधवा महिलांच्या हस्ते केली. गणपती हा समाजातील सुवासिनींप्रमाणे विधवा महिलांचाही देव असून त्या देवाची विधिवत पूजा करण्याचा मान विधवा महिलांनाही मिळायला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रमेश उलपे यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हेरवाड ग्रामपंचायतीने सुरु केलेला विधवांचा सन्मान या उपक्रमाचे अनुकरण राज्यभर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरु असतानाच कोल्हापूर शहरात प्रथमच कसबा बावडा येथील उलपे मळ्यातील विक्रमवीर मित्र मंडळाने गणेशोत्सव काळात गणेशाची आरती विधवा महिलांच्या हस्ते करून त्यांचा सन्मान करण्यात आला. रूढी परंपरेला फाटा देत विधवा महिलांना समाजातील विविध धार्मिक कार्यक्रमात इतर महिलांप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मंडळाने त्यांना गणेशाची आरती करण्याचा मान दिला. विक्रमवीर मंडळाची स्थापना 1985 ची असून मंडळामार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, खेळाचे साहित्य, पुरग्रस्थांना मदत, अन्नदान तसेच खासगी भिशीतून गरजुंना आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबवले जातात. चालू वर्षी पहिल्यांदाच साजरा केलेल्या गणेशोत्सवामध्ये विधवांचा सन्मान हा उपक्रम राबवण्यात आला. समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना समाज प्रवाहात आणण्याचे काम येत्या पुढील काळात मंडळाकडून करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष प्रकाश उलपे यांनी दिली.