येळ्ळूर, धामणे, सुळगा, यरमाळ येथील शेतकऱ्यांनी रिंगरोडविरोधात नोंदविल्या हरकती
बेळगाव : रिंगरोडसाठी येळ्ळूर, धामणे, सुळगा, यरमाळ या गावातील शेतकऱ्यांना नोटिसा आल्या होत्या. त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन देणार नाही, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना लिखित दिले आहे. रिंगरोडसाठी येळ्ळूरसह परिसरातील शेतकऱ्यांना नोटिसा आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने जाऊन आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. सदर जमीन ही सुपीक असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही. असे स्पष्ट म्हटले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यावेळीही हरकती नोंदविल्या होत्या. त्यानंतर पुन्हा नोटिफिकेशन काढून येळ्ळूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आता आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. तालुक्यातील 32 गावांतील जमिनी या रिंगरोडमध्ये जात आहेत. जवळपास 1200 एकरहून अधिक जमीन यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अनेकजण भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या रिंगरोडला विरोध केला आहे. बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. मंगळवारी येळ्ळूर, धामणे येथील शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यासाठी अॅड. प्रसाद सडेकर, अॅड. शाम पाटील उपस्थित होते. येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे सरचिटणीस प्रकाश अष्टेकर, विलास घाडी, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, मनोहर घाडी, गोविंद हलगेकर, शट्टुप्पा घाडी, अनिल घाडी, पंडित मंडोळकर, वसंत मंडोळकर, बसवंत सायनेकर, बाळू धामणेकर, अनिल बेळगावकर, पिराजी हलगेकर, संगाप्पा सायनेकर, तानाजी सायनेकर, परशराम हलगेकर, शेखर पाटील, तुकाराम धामणेकर, राजू धामणेकर, नितीन धामणेकर, विश्वास बेळगावकर, बसवंत मायाण्णाचे, पंडित पाटील, तातोबा मरगाण्णाचे, अशोक अकनोजी, मनोहर पाटील, रघुनाथ मरगाण्णाचे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.