पुढील राष्ट्रपती कोण होणार? यावर उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पुढील दोन महिन्यात रामनाथ कोविंद यांची मुदत संपत आहे आणि त्याअगोदर त्यांचा उत्तराधिकारी ठरणार आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकात भाजपने दैदिप्यमान यश मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ज्याच्यावर वरदहस्त असेल तो पुढील राष्ट्रपती होईल हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
या निवडणुकीतील मतदारांमध्ये उत्तरप्रदेशमधील आमदाराच्या मताची किंमत जास्त असल्याने भाजपप्रणीत रालोआचा जो कोणी उमेदवार ठरेल तो आरामात निवडून येणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षदेखील आपला संयुक्त उमेदवार उतरवणार अशी वृत्ते असली तरी त्याबाबत फारशी चर्चा भाजप विरोधकांत झालेली नाही. डाव्या पक्षांनी काही प्रादेशिक पक्षांशी अशा उमेदवाराबाबत बोलणी सुरु केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्याने अशा बोलण्यात पुढाकार घेणे सोनिया गांधींनी अजून तरी टाळलेले दिसत आहे. या महिन्यात मात्र अशी बोलणी होण्याची शक्यता आहे. कारण जुलै 25 ला कोविंद निवृत्त होत असल्याने राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे.
गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून तेलगू देशम, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल असे काही लहानमोठे पक्ष सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेले आहेत. पण त्याने फारसा फरक पडणार नाही. याउलट भाजपने उत्तरप्रदेश परत जिंकल्यापासून विरोधी पक्षात एक प्रकारचे नैराश्य आलेले आहे. बिजू जनता दलासारखे पक्ष वरकरणी आपण कोणाबरोबरच नाही असा दिखावा करतात पण अशा निवडणुकात जो पक्ष केंद्रात सत्तेत असेल त्याला मदत करतात. राज्यात केंद्राने आपल्याला कोणताही त्रास देऊ नये यासाठीची ही किंमत असते. केंद्रात भाजप असो अथवा काँग्रेस बिजू जनता दल ‘ज्याची सरशी, तिकडे पारशी’ या तत्वावर चालतो.
भारताचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा देशाचा नागरिक असावा. 35 वर्षावरील असावा. लोकसभा निवडणूक लढवण्यास पात्र असावा एवढीच माफक अट घटनेने घातली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान एका राज्यातील असले तरी घटनेची त्याला ना नाही. असे असल्यामुळे भावी राष्ट्रपती म्हणून गुजरातमधील एखाद्या नेत्याची निवड मोदींनी केली तर ती कायदेशीररित्या तरी आक्षेपार्ह होणार नाही. ‘सध्या गुजरातच सारा देश चालवत आहे’ अशी एकप्रकारे सार्थ ओरड विरोधी पक्ष करतात. याला कारण मोदींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह 7 मंत्री हे गुजरातमधील आहेत. याचबरोबर केंद्रातील महत्वपूर्ण अधिकाऱयांपैकी बरेचजण हे गुजरात कॅडरचे आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधान कार्यालय हे फार शक्तिशाली झालेले आहे असे जाणकार मानतात.
एका दगडात दोन पक्षी
आता राष्ट्रपतीपदाची निवडणूक समोर असताना गुजरातमधील विधानसभा निवडणूकदेखील जवळ आलेली आहे. गेली जवळजवळ 25 वर्षे भाजपने गुजरातवर आपला पगडा ठेवलेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र ‘भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ असे संबोधिले जाणाऱया गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जबर आव्हान उत्पन्न करून भाजपला एकूण 182 जागांपैकी 99 ला रोखले होते. मोदी गुजरातमधून केंद्रात आले आणि त्यांची राज्यावरील पकड ढिली पडली असे समजले जाऊ लागले. गेल्या पाच वर्षात भाजपने परिस्थिती सुधरवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला फारसे यश आलेले नाही. राज्यात कोविड महामारी ठिक तऱहेने हाताळली गेली नाही असे आरोप वाढत असताना गेल्या वषी तडकाफडकी मुख्यमंत्री विजय रूपानी यांना नारळ देण्यात आला. त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल यांच्यासारख्या नवख्या नेत्याला मुख्यमंत्री बनवले. यामुळे रूपानी मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नेतृत्व मानणारा राज्यातील राजकीय आणि आर्थिकदृष्टय़ा प्रभावी असा पाटीदार अथवा पटेल समाज हा अस्वस्थ झालेला आहे.
पाटीदार समाजाला चुचकारण्यासाठी मोदी पुढील राष्ट्रपती पटेल समाजातील बनवणार काय ? अशी चर्चा गुजरातमध्ये सुरु झालेली आहे. पंतप्रधानांनी असे केले तर उत्तरप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल या उमेदवार बनू शकतात. 2014ला मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आनंदीबेनना मुख्यमंत्री बनवून गुजरात त्यांच्याकडे सोपवला होता. त्या पंतप्रधानांच्या अतिविश्वासातील समजल्या जातात. आनंदीबेनना गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रपती बनवले जाईल तर एका दगडात दोन पक्षी मारले जातील.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप परत सत्तेत आल्याने पुढील लोकसभा निवडणूक देखील पक्षाने सर केलेली आहे असे वातावरण मोदींनी निर्माण केले असले तरी ते विरोधी पक्षांना फक्त घाबरवून सोडण्यासाठी. कोणत्याही राज्यातील निवडणुकीचा 2024च्या लोकसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही असे विख्यात निवडणूक समीक्षक प्रशांत किशोर यांनी ठासून सांगितले आहे.
निवडणुकीची हवा कधीकधी अचानक बदलू शकते याची जाणीव मोदींना असल्याने आपल्या खासमखास माणसाची नेमणूक पुढील राष्ट्रपती म्हणून होईल अशी ते तजवीज करतील असे सत्ताधारी वर्तुळात बोलले जात आहे. गमतीची गोष्ट म्हणजे राजधानीतील भाजप वर्तुळात कोविंद यांचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत फारसे कोणी बोलत नाही. कारण हा निर्णय केवळ पंतप्रधानच घेणार आणि त्याची अगदी शेवटच्या क्षणी घोषणा करणार हे त्यांना माहित आहे.
आनंदीबेन पटेल जर राष्ट्रपती बनल्या तर तो गृहमंत्री अमित शहा यांच्याकरता मात्र एक धक्का ठरेल. गुजरातच्या राजकारणात दोघांचे कधीच पटले नाही आणि त्यांनी तिथे शह-काटशहाचे राजकारण अजूनही चालवले आहे. आनंदीबेन 80 वर्षाच्या असून त्यांचे वय राष्ट्रपती बनण्याच्या आड येऊ शकते हेही तेव्हढेच खरे.
सुनील गाताडे