तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
निलजी ग्राम पंचायत अखत्यारित केएसआरटीसी कॉलनी ते श्रीराम कॉलनीपर्यंत नाल्याची खोदाई अर्धवट करण्यात आली आहे. कामासाठी दोन दिवस जवळपास 150 कामगार त्या ठिकाणी होते. मात्र, काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा नाला पावसाळय़ात त्रासदायक ठरणार आहे. तेव्हा हे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
निलजीपासून मुतग्यापर्यंत हा कालवा गेला आहे. मुतगा हद्दीपर्यंत काम झाले आहे. मात्र, निलजी ग्राम पंचायत हद्दीतील काम अर्धवट स्थितीत आहे. केवळ 100 ते 150 मीटर काम करून काम थांबविले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत हे काम करण्यात आले आहे. याबाबत केवळ वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. यावेळी सदर कामगार येथील एका झाडाखाली बसून झोपा काढून गेल्याची तक्रारही होत आहे. एकूणच हा चर्चेचा विषय बनला आहे. काम का बंद करण्यात आले, त्या कामाचे मोजमाप होते की नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. 150 कामगार या काळात किती खोदाई करू शकतात, याचा अंदाज असणे गरजेचे आहे. अर्धवट कामाची मोजणी केली जात आहे. त्यामुळे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
निलजी ते मुतग्यापर्यंतचा हा नाला महत्त्वाचा आहे. परिसरातील पाणी या नाल्यातून पुढे जात असते. बुजलेला नाला दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.