समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
राजकीय आखाडय़ाचे पैलवान मुलायम सिंह यादव यांच्या निघून जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे समाजवादी पक्षासोबत पूर्ण देशाच्या राजकारणासाठी देखील मोठे आव्हान असेल. राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी कुस्तीचा शौक असणारे मुलायम सिंह यादव हे पूर्वी शिक्षक म्हणून काम करायचे. समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित होत ते राजकारणात दाखल झाले. 1967 मध्ये सोशलिस्ट पार्टीच्या तिकीटावर पहिली निवडणूक जिंकली आणि सर्वात कमी वयाचा आमदार होत राजकीय कारकीर्द सुरू करणाऱया मुलायम यांनी अनेक उतारचढाव पाहिले. केंद्रात सत्ता स्थापन करण्यात त्यांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच काही वेळा केंद्रातील सरकार टिकविण्यात त्यांचे योगदान राहिले आहे.
मुलायम सिंह यादव 10 वेळा आमदार आणि 7 वेळा खासदार राहिले होते. 1 जून 1996 ते 19 मार्च 1998 पर्यंत ते देशाचे संरक्षणमंत्री होते. हा काळ देशात राजकीय अस्थिरतेचा होता. संरक्षणमंत्री म्हणून मुलायम सिंह यादव यांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
जर कुठल्याही हुतात्मा सैनिकाचे पार्थिव सन्मानासह त्याच्या घरी पोहोचत असेल तर याचे श्रेय मुलायम सिंह यादवांनाच जाते. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत सीमेवर एखादा सैनिक हुतात्मा झाल्यास त्याचे पार्थिवक घरी पोहोचविले जात नव्हते. तोपर्यंत हुतात्मा सैनिकाची टोपी त्याच्या घरापर्यंत पोहोचविली जात होती. संरक्षणमंत्री झाल्यावर मुलायम सिंह यादव यांनी हुतात्मा सैनिकाचे पार्थिव सन्मानासह त्याच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला होता.
हुतात्मा सैनिकाचे पार्थिव राजकीय इतमामात त्याच्या घरी पोहोचविण्यात येईल. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हुतात्मा सैनिकाच्या घरी जातील असा निर्णय मुलायम यांनी घेतला होता. मुलायम हे संरक्षणमंत्री असताना भारताने सुखोई-30 लढाऊ विमानांसाठी खरेदी करार करण्यात आला होता.
राजकीय प्रवास
22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तरप्रदेशच्या इटावामध्ये मुलायम यांचा जन्म झाला होता. राममनोहर लोहिया यांच्या विचारांनी ते प्रभावित होते. 1950 च्या दशकात त्यांनी शेतकऱयांसाठी आंदोलन केले होते. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह हे मुलायम यांना ‘लिटिल नेपोलियन’ असे संबोधित होते. 1967 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले, 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. ऑक्टोबर 1992 मध्ये त्यांनी जनता दलातून बाहेर पडत समाजवादी पक्ष स्थापन केला. त्यांचे हे पाऊल त्यांच्या राजकीय जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. 1989-91, 1993-95 आणि 2003-07 पर्यंत तीनेवळा ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
राजकारणातील कसलेला पैलवान
राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी मुलायम हे कुस्ती लढायचे, परीक्षा सोडून देत कुस्ती लढण्यासाठी ते पोहोचायचे. कवि संमेलनात तोरा दाखविणाऱया एका पोलीस अधिकाऱयाला त्यांनी व्यासपीठावरच लोळवले होते. राजकारणातील आखाडय़ातही ते मोठे पैलवान ठरले आणि विरोधकांना चितपट करत गेले. राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी स्वतःची वाटचाल सुरूच ठेवली होती. मृत्य समोर उभा ठाकल्यावर त्याच्याशीही त्यांनी झुंज दिली होती.
पोलीस अधिकाऱयाला लोळविले
29 जून 1960 रोजी मैनपुरीच्या करहल येथील महाविद्यालय परिसरात कवि संमेलन सुरू होते, त्यावेळचे प्रसिद्ध कवि दामोदर स्वरुप विद्रोही देखील उपस्थित होते. त्यांनी तेथे ‘दिल्ली की गद्दी सावधान’ ही स्वतःची कविता वाचण्यास सुरवात केली होती, ही कविता सरकारच्या विरोधात असल्याने तेथे तैनात पोलीस अधिकाऱयाने त्यांचा माइक काढून घेतला होता. सरकारविरोधातील कविता वाचू शकत नसल्याचे अधिकाऱयाने म्हटले होते. व्यासपीठावर हा गोंधळ सुरू असतानाच 21 वर्षांचा पैलवान धावत तेथे पोहोचला आणि त्याने पोलीस अधिकाऱयाला उचलून व्यासपीठावर आपटले. हा युवक म्हणजे मुलायमच होते.
जीव वाचविण्यासाठी कांगावा
4 मार्च 1984 रोजी इटावा आणि मैनपुरी येथील सभेनंतर मुलायम हे एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरू झाला होता. गोळीबार करणारे छोटेलाल आणि नेत्रपाल हे वाहनासमोरच उभे होते. छोटेलाल हा नेताजींचा पूर्वाश्रमीचा सहकारी होता, याचमुळे त्याला ते कुठे बसतात हे ठाऊक होते. गोळीबारामुळे चालकाचे लक्ष विचलित होत गाडी नाल्यात कोसळली होती. अशा स्थितीत प्रसंगावधानता दाखवत नेताजींनी स्वतःच्या समर्थकांना ‘नेताजी मारले गेले, त्यांना गोळी लागली’ असे ओरडण्यास सांगितले होते. समर्थकांच्या या ओरडण्यामुळे हल्लेखोरांना नेताजी खरोखरच मारले गेल्याचे वाटले आणि त्यांनी गोळीबार थांबविला. हल्लेखोर पलायन करत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात छोटेलालचा मृत्यू झाला होता.
कारसेवकांवर गोळय़ा झाडण्याचा आदेश
1989 मध्ये लोकदलात असताना मुलायम सिंह यादव हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 90 चे दशक सुरू होताच देशभरात मंडल-कमंडलची लढाई सुरू झाली. अशा स्थितीत 1990 मध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येत कारसेवा सुरू केली होती. 30 ऑक्टोबर 1990 रोजी कारसेवकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. कारसेवक पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून बाबरी ढांचाच्या दिशेने सरकत होते. यावेळी मुलायम यांनी कठोर निर्णय घेत प्रशासनाला गोळीबाराचा आदेश दिला होता. पोलिसांच्या गोळीबारात 6 कारसेवकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा 2 नोव्हेंबर 1990 रोजी हजारो कारसेवक हनुमान गढीनजीक पोहोचले. मुलायम यांच्या आदेशानुसार पोलिसांना पुन्हा गोळीबार करावा लागला आणि यात 12 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. कारसेवकांवर गोळीबार करविण्याच्या निर्णयामुळे मुलायम हे ‘हिंदूविरोधी’ ठरले होते. विरोधकांनी त्यांना ‘मुल्ला मुलायम’ असे नावही दिले होते. परंतु या निर्णयामुळे मुलायम यांना राजकीय लाभ देखील झाला होता.
काशिरामांसोबत आघाडी
1956 मध्ये राममनोहर लोहिया हे दलित-मागास यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत होते. परंतु त्यांना यात यश आले नव्हते. 1992 मध्ये बाबरी विध्वंसानंतर मुलायम यांनी लोहिया यांच्या या योजनेला अंमलात आणण्याच्या दिशेने काम सुरू केले होते. मुलायम यांनी तत्कालीन दिग्गज दलित नेते काशिराम यांच्यासोबत आघाडीची घोषणा केली होती. मुलायम यांच्या या मास्टरस्ट्रोकचा प्रभाव निवडणुकीच्या निकालात दिसून आला होता. 422 सदस्यीय विधानसभेत सप-बसप आघाडीला 176 जागा मिळाल्या. तर भाजप बहुमतापासून दूर राहिला होता. मुलायम यांनी अन्य छोटय़ा पक्षांना सोबत घेत सत्ता हस्तगत केली होती. मुलायम सत्तेत आल्यावर उत्तरप्रदेशात ‘मिले मुलायम-काशिराम, हवा में उड गए जय श्रीराम’ हा नारा चर्चेत आला होता.
कल्याण सिंह यांना समर्थन
2009 साली भाजपमधून बाहेर पडत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱया कल्याण सिंह यांच्या समर्थनार्थ मुलायम सिंह यादव यांनी प्रचारसभा घेतली होती. बाबरी विध्वंसावेळी कल्याण सिंह हे मुख्यमंत्री होते आणि अवमानाप्रकरणी त्यांनी शिक्षाही भोगली होती. कल्याण सिंह यांना पाठिंबा दिल्याने समाजवादी पक्षात फूट पडली होती. वरिष्ठ नेते आझम खान यांनी मुलायम सिंह यांच्यावर टीका केली होती. निवडणुकीत मुलायम यांना याचा फटका बसला होता. परंतु मुलायम यांच्या पाठिंब्याने कल्याण सिंह विजयी झाले होते.
मुलायम अन् साधना यांची लव्ह स्टोरी
40 वर्षांपूर्वी रुग्णालयात जडले होते प्रेम
मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता यांची लव्हस्टोरी 40 वर्षांपूर्वी सैफईच्या एका रुग्णालयातून सुरू झाली होती. 9 जुलै 2022 रोजी साधना यांचे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर मुलायम यांनी याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
1982 पासून प्रारंभ…
80 च्या दशकात देशात काँग्रेसचा प्रभाव ओसरू लागला होता. उत्तरप्रदेशात मागास वर्ग विशेषकरून यादवांचा दबदबा वाढत होता. मुलायम सिंह यादव तेव्हा सर्वाधिक चर्चेत होते, परंतु तेव्हा समाजवादी पक्ष अस्तित्वात नव्हता. राष्ट्रीय लोकदलात मुलायम हे कार्यरत होते. त्याच काळात औरैया जिल्हय़ातील बिधूना येथे राहणारी 23 वर्षीय साधना गुप्ता नर्सिंगचे शिक्षण घेत होत्या. राजकारणात काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. राजकीय कार्यक्रमांमध्ये त्या उपस्थित रहायच्या. याच काळात मुलायम आणि साधना यांच्यात ओळख निर्माण झाली. दोघेही कशाप्रकारे प्रेमाच्या नात्यात आले हे केवळ एकच व्यक्ती जाणून होता आणि त्याचे नाव अमर सिंह होते.
अखिलेश यादव यांची बायोग्राफी ‘बदलात की लहर’ पत्रकार सुनीता ऐरोन यांनी लिहिली आहे. यातील काही पाने मुलायम यांच्या प्रेमकथेवर बेतलेली आहेत. यानुसार मुलायम यांच्या मातोश्रीमुळे ते दोघे नजीक आले. मुलायम यांची आई मूर्ती देवी आजारी असायच्या. साधना यांनी लखनौ येथील एक नर्सिंग होम आणि नंतर सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मूर्ती देवींची देखभाल केली होती.
चुकीचे इंजेक्शन देण्यापासून रोखले
वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स मूर्ती देवी यांना चुकीचे इंजेक्शन देत होती, त्यावेळी साधना तेथे उपस्थित होत्या आणि त्यांनी नर्सला असे करण्यापासून रोखले होते. साधना यांच्यामुळे मूर्ती देवी यांचा जीव वाचला होता. यामुळे भारावून गेलेले मुलायम यांचे साधना यांच्यावर प्रेम जेडले होते. तेव्हा अखिलेश यादव हे शाळेत होते.
अमर सिंहांना होती पूर्ण माहिती
1982-88 पर्यंत मुलायम हे प्रेमात पडल्याचे माहित असणारी एकमेव व्यक्ती अमर सिंह होते. मुलायम हे तेव्हा विवाहित होते आणि त्यांची पत्नी मालतीदेवी आणि मुलगा अखिलेश घरात असल्याने अमर सिंह यांनी हे सत्य जगापासून लपवून ठेवले होते.
विश्वनाथ चतुर्वेदीमुळे समोर आली लव्हस्टोरी
विश्वनाथ चतुर्वेदी हे मुलायम यांच्या जीवनातील अजब क्यक्तिमत्त्व ठरले. त्यांनी मुलायम यांच्या जीवनातील काही कधीच न उघड झालेल्या गोष्टी सर्वांसमोर आणल्या. त्यांनी मुलायम यांच्या विरोधात 2 जुलै 2005 रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत 1979 मध्ये 79 हजार रुपयांची मालमत्ता असणारा समाजवादी कोटय़वधींचा मालक कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश दिला.
चौकशीतून समोर आली माहिती
चौकशीच्या अहवालात मुलायम यांना आणखी एक पत्नी आणि तिच्यापासून मूल असल्याचे नमूद होते. 1994 मध्ये प्रतीक गुप्ताने शाळेच्या अर्जावर स्वतःचा पत्ता म्हणून मुलायम सिंह यांचा अधिकृत पत्रा नमूद केला होता. तर आईचे नाव साधना गुप्ता आणि वडिलांचे नाव एम.एस. यादव लिहिले होते. 2000 साली प्रतीकचे पालक म्हणून मुलायम यांचे नाव नोंद झाले होते. 23 मे 2003 रोजी मुलायम यांनी साधना यांना स्वतःच्या पत्नीचा दर्जा दिला. साधना या मुलायम यांच्या जीवनात 1988 मध्ये आल्या आणि 1989 मध्ये मुलायम हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून साधना गुप्ता या आपल्यासाठी सुदैवी असल्याचे मुलायम यांचे मत तयार झाले होते.
2007मध्ये मुलायम यांनी स्वतःविरोधात सुरू असलेल्या ज्ञान उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. साधना गुप्ता या माझ्या पत्नी आणि प्रतीक माझा मुलगा असल्याचे मान्य करतो असे मुलायम यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. 2019 पूर्वी मुलायम हे 23 वर्षांपर्यंत लखनौच्या शासकीय बंगल्यात राहत होते. परंतु 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर त्यांना बंगला सोडावा लागला. तेव्हा ते साधना यांच्यासोबत एका घरात रहायला गेले होते. तेव्हापासून ते साधना यांच्यासोबतच राहत होते.
चीन खरा शत्रू असल्याची भूमिका, पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू
उत्तरप्रदेशचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव हे केंद्रीय संरक्षणमंत्री देखील होते. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. याचमुळे त्यांचा ‘सर्वोत्तम संरक्षणमंत्री’ असाही उल्लेख झाला होता. मुलायम यांनी स्वतःच्या कार्यकाळात देशाला नेहमीच चीनबद्दल सतर्क केले होते. पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू असल्याचे त्यांनी म्हटले होते. सद्यकाळातील भारत आणि चीनमधील तणाव पाहता मुलायम यांची ही भूमिका प्रासंगिक वाटणारी आहे.
एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजरात यांच्या सरकारमध्ये 1996-98 पर्यंत मुलायम हे संरक्षणमंत्री होते. सियाचीन ग्लेशियरला भेट देणारे ते देशाचे पहिले संरक्षणमंत्री होते. मुलायम यांच्या कार्यकाळादरम्यान पाकिस्तानने दोन वर्षांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नव्हते. मुलायम यांच्या कार्यकाळातच भारतीय सैन्याला 4 किलोमीटरपर्यंत मागे ढकलले होते.
चीनला तिबेट गिळपृंत करू देणे भारताची सर्वात मोठी चूक होती असे मुलायम यांनी संसदेत बोलताना म्हटले होते. चीनने तिबेटवर कब्जा केल्यापासून तो भारतासाठी धोका ठरला आहे. देशासमोरील या धोक्याची जाणीव सर्वप्रथम डॉ. राममनोहर लोहिया यांनी करून दिली होती. त्यांनी तिबेटवर चीनच्या हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सतर्कतेचा इशाराही दिला होता.
चीन कधीच भारताचा मित्र होऊ शकत नाही. चीनने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही विश्वासघात केला होता. पाकिस्तानच्या तुलनेत चीन अधिक मोठा धोका असल्याचे मुलायम यांनी म्हटले होते.
बच्चन कुटुंबाशी मैत्री
मुलायम सिंह यादव यांच्यासोबत बच्चन कुटुंबाचे अत्यंत दृढ संबंध राहिले आहेत. जया बच्चन यांना समाजवादी पक्षाने तीनवेळा राज्यसभेवर पाठविले आहे. यादव आणि बच्चन कुटुंबात मैत्री दिवंगत अमर सिंह यांनी घडवून आणली होती. अमिताभ बच्चन यांनी काँग्रेससोबतचे संबंध पूर्णपणे तोडल्यावर आणि स्वतःची बुडालेली कंपनी एबीसीएलसाठी एखाद्या तारणहारचा शोध चालविला होता. तेव्हा मुलायम सिंह यादव यांनी अमिताभ यांना मदत केल्याचे मानले जाते.
चालू शतकाच्या प्रारंभिक वर्षांमध्ये अमर सिंह, मुलायम आणि अमिताभ बच्चन हे वारंवार एकत्र दिसून यायचे. उत्तरप्रदेश निवडणुकांमध्ये अमिताभ बच्चन यांनी समाजवादी पक्षासाठी प्रचारही केला होता. दोघेही परस्परांच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सामील व्हायचे. अमिताभ बच्चन यांनी मुलायम यांनी उत्तरप्रदेशचा ब्रँड ऍम्बेसिडर म्हणूनही नियुक्त केले होते.
जया बच्चन या 2004 मध्ये समाजवादी पक्षाच्या वतीने राज्यसभेवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी यादव आणि बच्चन कुटुंबातील मैत्री शिखरावर होती. 2008 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचा विवाह घडवून आणण्यात अमर सिंह यांची भूमिका होती असे मानले जाते.
मुलायम सिंह यांचा राजकीय प्रवास
मुलायम सिंह यादव यांनी भारतीय राजकारणाचा सर्वात मोठा आखाडा मानल्या जाणाऱया उत्तरप्रदेशच्या राजकारणात पाऊल ठेवल्यावर बरेच बदल घडून आले. मुलाम यांनी राजकीय जीवनात अनेक मोठे निर्णय घेतले, परंतु यातील 3 निर्णयांसाठी त्यांचे नेहमीच स्मरण केले जाणार आहे.
कुस्ती करण्याचा निर्णय
कुस्ती लढण्याच्या निर्णयाने मुलायम हे वयाच्या केवळ 28 व्या वर्षी राज्यातील सर्वात कमी वयाचे आमदार झाले होते. जसवंत नगरमध्ये एका कुस्ती स्पर्धेत आमदार नत्थू सिंह यांची नजर मुलायम यांच्यावर पडली. नत्थू हे मुलायम यांचे प्रशंक झाले होते. त्यांनी 1967 च्या निवडणुकीत जसवंत नगर मतदारसंघात स्वतःऐवजी मुलायम यांना उमेदवारी मिळवून दिली होती.
भारतीय लोकदलात प्रवेश
12 नोव्हेंबर 1967 रोजी डॉ. लोहिया यांच्या निधनानंतर उत्तरप्रदेशच्या राजकारणात सोशलिस्ट पार्टीचा प्रभाव कमी होऊ लागला आणि राज्यात चौधरी चरण सिंह यांचा भारतीय लोकदल पक्ष मजबूत होत होता. मुलायम सिंह त्यावेळी लोकदलात सामील झाले. 70 च्या दशकात जयप्रकाश नाराण यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू झाले. मुलायम सिंह यादवच नव्हे तर लालूप्रसाद यादव, नितीश कुमार आणि रामविलास पासवान देखील यात सहभागी झाले. 1975 मये देशात आणीबाणी लागू झाली आणि मुलायम यांना 19 महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणी संपुष्टात अल्यावर देशात झालेल्या निवडणुकीत 1977 मध्ये केंद्र तसेच उत्तरप्रदेशात जनता पक्षाचे सरकार आले आणि मुलायम हे राज्य सरकारमध्ये मंत्री झाले.
नव्या पक्षाची स्थापना
80 च्या दशकात उत्तरप्रदेशच्या राजकारणाचे चक्र पुन्हा पलटले आणि चौधरी चरण सिंह यांच्या निधनानंत राष्ट्रीय लोकदलात फूट पडली. यादरम्यान मुलायम सिंह यादव हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 1992 मध्ये त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. याच पक्षाला आता समाजवादी पक्ष म्हटले जाते. 1989 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर 1993-95 मध्ये ते दुसऱयांदा मुख्यमंत्री झाले होते. 2003 मध्ये ते तिसऱयांदा मुख्यमंत्री झाले होते.
संसदेत पंतप्रधान मोदींना आशीर्वाद
मुलायम सिंह यादव यांचा पक्ष सप आणि भाजप नेहमीच परस्परांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. परंतु मुलायम सिंह यादव यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेतील स्वतःच्या भाषणात नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद दिला होता. जेवढे आता खासदार आहेत ते सर्व पुन्हा निवडून यावेत अशी आमची प्रार्थना असल्याचे मुलायम यांनी म्हटले होते.
पंतप्रधान मोदींनी सर्वांशी मिळून-मिसळून काम केले आणि सर्वांसाठी काम केले. याचमुळे मी जेव्हा कुठल्याही कामासाठी त्यांना सूचना केली, तेव्हा मोदींनी त्या कामासाठी त्वरित संबंधित अधिकाऱयांना आदेश दिला आहे. याचमुळे नरेंद्र मोदींचा आदर करतो असे मुलायम यांनी संसदेत म्हटले होते.
सर्वांना सोबत घेत वाटचाल करणे अत्यंत अवघड आहे, तरीही मोदींनी सर्वांना साब्sात घेत वाटचाल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी माझी इच्छा असल्याचे मुलायम यांनी म्हटल्यावर मोदींनी हात जोडून त्यांचे आभार मानले होते.
दोनवेळा थोडक्यात हुकले पंतप्रधानपद
केवळ शपथ घेणे होते शिल्लक
भारताच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान बाळगून असणाऱया मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. ते अशा राज्यात स्वतःचा प्रभाव राखून होते, ज्यामुळे देशाचे सरकार निश्चित होत असे. देशाचा पंतप्रधान याच राज्यातील खासदारांमुळे ठरायचा. आखाडय़ाचे पैलवान असणारे मुलायम एकदा नव्हे तर दोनदा पंतप्रधान होण्यापासून वंचित राहिले हेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडल्याची खंत त्यांना आयुष्यभर सतावत होती. 4 लोक मी पंतप्रधान होण्यासाठीच्या वाटेत आडवे आल्याचे त्यांनी एकदा म्हटले हेते.
90 च्या दशकात राजकारणात बरीच उलथापालथ सुरू होती. 1996 मध्ये समाजवादी पक्ष राष्ट्रीय राजकारणात लक्ष वेधून घेत होता, तेव्हा भाजप 161 जागा जिंकून सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत पोहोचला होता. तर काँग्रेसला केवळ 141 जागा मिळाल्या होत्या. भाजपने सरकार स्थापन केले आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. वाजपेयींचे हे सरकार 16 दिवसात बहुमताअभावी कोसळले होते. त्यानंतर मुलायम यादवांकडे पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती. संयुक्त मोर्चाचे आघाडी सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुलायम यांचे पंतप्रधानपद निश्चित झाले होते, परंतु लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्या विरोधामुळे मुलायम या शर्यतीतून मागे पडले. लालू यादवांवर मुलायम प्रचंड चिडले होते. मुलायम यांच्या नावाच्या जागी एच.डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद मिळाले आणि मुलायम यांना संरक्षण मंत्रालयावर समाधान मानावे लागले होते.
लालू यादवांमुळे हिरमोड
1997 मध्ये मुलायम यांचे हे दुःख आणखी वाढले, तेव्हा ते दुसऱयांदा पंतप्रधान होण्याच्या तयारीत होते, परंतु लालूप्रसाद यांनी पुन्हा यात अडथळे निर्माण केले. एच.डी. देवेगौडा यांच्या सरकारचा पाठिंबा काँग्रेसने 324 दिवसात काढून घेतला होता. त्यावेळी लालूप्रसाद हे चारा घोटाळय़ामुळे अडचणीत आले होते. त्यांच्यावर सीबीआयच्या कारवाईचा फास आवळला गेला होता. देवेगौडा यांनी याप्रकरणी लालू यादवांना मदत करण्यास नकार दिल्याचे मानले जाते. देवेगौडा यांना पंतप्रधानपद गमवावे लागल्यावर लालू यादव हेच इच्छुक होते. परंतु चारा घोटाळय़ामुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर माकपचे ज्योति बसू यांचे नाव समोर आले, परंतु त्यांच्याच पक्षाने त्यांचे नाव फेटाळले. स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून मुलायम यांचे नाव डाव्या पक्षांचे नेते हरिकिशन सुरजीत यांनी मांडले होते. कम्युनिस्ट पक्ष मुलायमांना पाठिंबा देण्यास तयार होता. परंतु लालूंनी मुलायम यांना समर्थन देण्यास नकार दे इंदकुमार गुजराल यांचे नाव समारे केले होते.
द सोशलिस्ट पुस्तकात दावा
मुलायम सिंह यादवांच्या जीवनावर आधारित ‘द सोशलिस्ट’ हे आत्मचरित्रवजा पुस्तक प्रँक हुजूर यांनी लिहिले आहे. देवेगौडा पंतप्रधान झाले, मी देखील होऊ शकलो असतो, लालू यादवांनी मात्र यात आडकाठी आणली, लालू आणि शरद यादव यांनी माझ्याविरोधात कट रचला. मुलायम सिंह पंतप्रधान झाल्यास विष खाणार असल्याचे लालूंनी म्हटले होते असा दावा मुलायम यांनी केला होता.
प्रतिक्रिया
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मुलायम सिंह हे तळागाळातल्या राजकारणाशी निगडित सच्चे योद्धा होत. अखिलेश यादव यांच्यासमवेत सर्व शोकाकुल कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो.
राहुल गांधी, काँग्रेस खासदार
मुलायम सिंह हे मातब्बर लोहियावादी नेते होते आणि प्रत्येक पक्षात त्यांचे चाहते होते. देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम केले. 2002 साली एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव राष्ट्रपती म्हणून प्रस्तावित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
जयराम रमेश, काँग्रेस महासचिव
तळागाळाशी जोडला गेलेला नेता म्हणून मुलायम सिंह यादव यांची ओळख होती. राजकीयदृष्टय़ा विरोधक असले तरीही मुलायम यांचे सर्वांसोबत अत्यंत चांगले संबंध होते. त्यांच्याशी भेट झाल्यावर ते अत्यंत मोकळय़ा मनाने अनेक विषयांवर चर्चा करायचे. मुलायम यांनी स्वतःच्या कारकीर्दीत अनेक पदांवर काम केले आणि देश, समाज तसेच राज्याच्या विकासात योगदान दिले होते.
राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
मुलायम सिंह यादव यांचे राजकीय कौशल्य अद्भूत होते. अनेक दशकांपर्यंत त्यांनी भारतीय राजकारणाचा एक स्तंभ ठरत समाज आणि देशाची सेवा केली आहे. तळागाळाशी जोडले गेलेले परिवर्तनकारी, सामाजिक सदभावाचे नेते, आणीबाणीत लोकशाहीवादी मूल्यांकरता लढणारा नेता म्हणून ते सदैव स्मरणात राहणार आहेत.
जगतप्रकाश नड्डा, भाजप अध्यक्ष
राष्ट्रीय पातळीवरील महान नेता आणि समाजवादी पक्षाच्या संस्थापकाच्या निधनाच्या वृत्तामुळे मी अत्यंत दुःखी आहे. त्यांचे निधन आमचा देश आणि राजकीय क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. त्यांचे कुटुंबीय तसेच समर्थकांबद्दल संवेदना व्यक्त करते.
ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
समाजवादी पक्षाचे संस्थापक तसेच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन राजकीय क्षेत्रासाठी कधीच भरून न निघणारी हानी आहे. ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी.
मनोहरलाल खट्टर, हरियाणाचे मुख्यमंत्री