प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा प्रशासनाकडून व्यापारी व त्यांच्या कामगारांनी आरटीपीसीआर किंवा रॅपीड करून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. लस घेईपर्यंत संबंधितांनी 15 दिवसांनी टेस्ट करावी असे सांगण्यात येते. यात अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडिकलचाही समावेश आहे. परंतु, या मेडिकल व्यावसायिकांजवळ असलेल्या कर्मचाऱयांपैकी एखादा पॉझिटिव्ह आला तर संपर्कातील सर्वांनाच क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. परिणामी, या सेवेवर होणाऱया परिणामांचा विचार करत अशा अत्यावश्यक सेवेत काम करणाऱया 45 वर्षाखालील व्यावसायिक व त्यांच्या कामगारांना लस देण्याबाबतची कार्यवाही होण्याची गरज आहे.
याबाबत जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नंदू उबाळे म्हणाले, मेडिकल व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत येतो. येथे कार्यरत कर्मचाऱयांपैकी एखादा पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या हायरिस्क संपर्कातील म्हणून मालकासहित सर्व कामगारांना काही दिवस क्वारंटाईन रहावे लागणार. या कालावधीत ही अत्यावश्यक सेवा बंद राहते. 15 दिवसांनी अशी स्थिती उद्भवली तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
यासाठी 45 वर्षाखाली अत्यावश्यक सेवेत येणाऱया मेडिकल व्यावसायिक व त्यांच्याकडे कामगारांना लस देण्याच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेत संबंधितांना लस देण्याबाबतच्या सूचना निर्गमीत केल्यास होणारी अडचण टाळता येणे शक्य आहे. तसे न झाल्यास औषधांच्या शॉर्टेजचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभिर्याने प्रश्न हाताळत मार्ग काढण्याची गरज असल्याचे उबाळे यांनी सांगितले.