अश्वत्थामा लहान बालक होता. तो दूध पिण्यासाठी आईपाशी हट्ट धरी. द्रोणांच्या आश्रमात गाय नव्हती. त्यामुळे त्याची आई पीठ पाण्यामध्ये कालवून दूध म्हणून अश्वत्थामाला पाजत असे. एकदा हा प्रकार द्रोणांनी पाहिला. त्यांना आपल्या गरीबीबद्दल अत्यंत वाईट वाटले. आपला बालपणीचा मित्र द्रुपद आता पांचाल देशाचा राजा झाला आहे. तो आपल्याला मदत करेल असे त्यांना वाटले. ते मदत मागण्याकरिता द्रुपदाच्या दरबारी गेले. पण द्रुपदाने त्यांना साधी ओळखही दाखवली नाही. त्यावेळी द्रोणांनी त्याला आपल्या बालपणीच्या मैत्रीची आठवण करून दिली. त्यावर द्रुपद म्हणाला-दोन राजांमध्ये मैत्री होऊ शकते. राजा व भिकारी यांच्यामध्ये कशी होईल मैत्री? द्रुपदाने केलेला अपमान द्रोणांच्या जिव्हारी लागला. द्रुपदाने केलेल्या अपमानाचा बदला घेण्याचा द्रोणांनी मनोमन निश्चय केला. ते हस्तिनापुरास गेले आणि पितामह भीष्मांची विनंती मान्य करून त्यांनी कौरव पांडव राजपुत्रांचे गुरुपद स्वीकारले. राजपुत्रांचा विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली. राजपुत्रांनी विचारले – गुरुवर्य! आपणास आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावे? त्यावर द्रोणाचार्य म्हणाले – मला गुरुदक्षिणा म्हणून सोने, चांदी, संपत्ती काहीही नको. आपण पांचाल देशाचा राजा द्रुपद याला पराभूत करून बंदी बनवून माझ्या समोर हजर करावे. हीच माझी गुरुदक्षिणा समजा. गुरु द्रोणांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम कौरवांनी आपल्या सैन्यासह पांचाल देशावर स्वारी केली. द्रुपद महापराक्रमी होता. त्याने कौरव सैन्याची धूळदाण उडवली. दुर्योधन, दु:शासन, कर्ण या सर्वांना पराभूत होऊन पळावे लागले. मग पांडवांनी द्रुपदावर हल्ला चढवला. तुंबळ युद्ध जुंपले. अर्जुनाने आपल्या अमोघ बाणांच्या वर्षावाने द्रुपदाला जायबंदी केले, त्याला पकडले व आपल्या रथाला बांधून गुरु द्रोणाचार्य यांच्यासमोर हजर केले. द्रोण अर्जुनावर खूष झाले. राजा द्रुपदाला द्रोण म्हणाले – राजन्! मी आजही आपल्या मैत्रीची इच्छा करतो. आपण म्हणाला होतात की दोन राजांमध्येच मैत्री होऊ शकते. याकरिता आजपासून आपल्या राज्याचे दोन भाग होतील. गंगेच्या दक्षिणेकडील भागाचे राज्य आपण भोगावे व गंगेच्या उत्तरेकडील राज्यावर माझी सत्ता चालेल. द्रुपदाने द्रोणांची माफी मागितली व म्हणाला – मित्रवर्या! आपला प्रस्ताव मला मान्य आहे. अर्जुनासारखा पराक्रमी वीर मी आजवर पाहिला नाही. असा शिष्य आपल्याला लाभला आणि आपण धन्य झालात.
लाक्षागृहातील आगीत अर्जुन जळून मृत्यूमुखी पडला या वार्तेने द्रोणांना विशेष दु:ख होत होते. बलराम व कृष्णाने त्यांचे सांत्वन केले. कृष्ण म्हणाला – ज्या शिष्याला गुरुचे आशीर्वाद लाभतात व गुरु ज्याच्या गुणांची स्तुती करतात तो शिष्य धन्य होय. अर्जुनाचे आयुष्य गुरुंच्या आशीर्वादाने सफल झाले व त्याच्या जन्माचे सार्थक झाले. मग ते दोघे सभागृहात आले. इतर दुर्योधनप्रमुख । धार्तराष्ट्रही करिती शोक । बाह्य संपादिती लौकिक । परम संतोख हृत्कमळ। कर्ण दु:शासनादि येर । सहित अवघेचि गान्धार । बाह्य विलाप करिती फार ।
परी तें अंतर हरि जाणे ।
Ad. देवदत्त परुळेकर