ज्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नावाचा राक्षस आहे त्यांना उपरोक्त वाक्मय नक्की ठाऊक असणार. तिथे सुंदर आयुष्याच्या वेगवेगळय़ा व्याख्या सतत येत असतात. त्यापासून प्रेरणा घेऊन आम्हाला देखील सुंदर आयुष्याच्या व्याख्या लिहाव्याशा वाटल्या.
आयुष्य सुंदर आहे. फक्त
सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग, अमुक सणाच्या शुभेच्छासारखे निर्बुद्ध मेसेजेस, सुभाषिते, आरोग्यविषयक सल्ले, चार ओळींच्या कविता कोणाकडून येऊ नयेत, जेणेकरून एखादा महत्त्वाचा निरोप असेल तर तो वाचता यावा.
रोज एका तरी पुढाऱयाने आचरट, पोरकट विधान करून आम्हाला हसवावे. नंतर त्यांनी बेशक ते विधान मागे घ्यावे, ‘माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला’ वगैरे खुलासे करावेत. आमची हरकत नाही. ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती’ असे म्हणतात. या पुढाऱयांच्या बाबतीत मूळ विधान ‘बुंद से..’ ने जे हसू येते ते नंतरच्या खुलाशाने येत नाही.
पुढारी लोक नियमितपणे पोरकट बोलून जी करमणूक करतात तीवर सरकारने जीएसटी लावू नये. सध्या गोरगरीब जनतेला फुकट मिळणारी तेवढीच गोष्ट शिल्लक आहे.
दहा रु.त जेवणाची थाळी ठरावीक ठिकाणी मिळणार आहे असे म्हणतात. त्या ठरावीक ठिकाणांपैकी एक ठिकाण आमच्या घराजवळ असावे आणि केव्हाही गेलो तरी तिथे आम्हाला दहा रु.त जेवण खरोखरच मिळावे.
दर वषी साहित्य संमेलने होतात. त्यात म्हणे करोडो रु. खर्च होतात. हे पैसे कंत्राटदारांना, केटरर्स मंडळींना, निमंत्रित साहित्यिकांना वगैरे मिळतात. त्याबद्दल तक्रार नाही. पण ज्या वाचकांच्या जिवावर साहित्य जगते त्या वाचकांनादेखील संमेलनांनी काहीतरी द्यावे. कोल्हापूरला झालेल्या संमेलनात वाचकांना तीन दिवस चक्क चहा, न्याहारी, जेवण मिळाले होते. तो योग पुन्हा आला नाही. वाचकांना खायला-प्यायला नाही मिळाले तर निदान साहित्याचा, करमणुकीचा आनंद मिळावा. परिसंवाद ऐकून करमणूक होत नाही, किंबहुना काहीच होत नाही. दर वषी साहित्य संमेलनात वेगवेगळे जोरदार वाद होतात. या वादांमुळे करमणूक होते. या वादांचे शब्दांकन केलेल्या पुस्तिका छापून संमेलनात मोफत वाटल्या तर वाचकांना थोडा तरी आनंद मिळेल.
महाराष्ट्रात आता वर्षभर तरी नवे नाव धारण केलेले चहाचे किंवा मिसळीचे हॉटेल निघू नये. आहेत तीच नीट चालली तरी पुरे!