दापोली/ प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी राज्यभरात विविध केंदांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी दापोली येथील वराडकर बेलोसे महाविद्यालयाच्या केंदावर रविवारी चांगलाच गोंधळ उडाला.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 40 टक्के’ या पदासाठी रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत परीक्षा होती. दापोली शहरातील नॅशनल हायस्कूल व आर. आर. वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल तसेच वराडकर-बेलोसे महाविद्यालय ही या परीक्षेची केंद्रे होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून अनेक परीक्षार्थी शनिवारी दापोलीत दाखल झाले होते. वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या केंदावर रविवारी सकाळी 8.30 वाजताच परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला परीक्षेचे हे केंद्र असल्याचे तोपर्यंत माहितीच नव्हते. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.
या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर हे आर. आर. इंग्लिश मिडियम स्कूल या परीक्षा केंदाचे मुख्य होते. अनेक विद्यार्थी महाविद्यालयात परीक्षेला आल्याची माहिती मिळताच त्यांनी महाविद्यालय गाठले व शासकीय अधिकाऱयांशी संपर्क सुरु केला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत या परीक्षा केंदावर किती परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत याची माहितीच तोपर्यंत देण्यात आली नव्हती. तसेच
परीक्षार्थीचे क्रमांकही देण्यात आले नव्हते. त्यामुळे बेंचवर कोणते क्रमांक लिहायचे, असा प्रश्न प्राचार्य निंबाळकर यांना पडला. सकाळी 9.45 वाजता यासंदर्भातील सर्व मुद्दे निकाली निघाल्यावर एका वर्गात 24 परीक्षार्थी असे 24 वर्गात 576 क्रमांक लिहिण्यात आले. त्यानंतर सर्व परीक्षार्थींना वर्गात बसण्याची सूचना दिल्यावर परीक्षार्थिंनी परीक्षा रद्द करा अशी मागणी केली. मात्र या परीक्षा केंद्रात आलेले दापोलीचे निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी या केंद्रावरील अधिकाऱयांना परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितल्यावर चिडलेल्या परीक्षार्थींनी आम्ही परीक्षाच देणार नाही असे सांगितले.
त्यावेळी परीक्षा केंद्रावर आलेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी परीक्षा न दिल्याने प्रश्न सुटणार नाही, त्यात तुमचेच नुकसान असून आधी तुम्ही परीक्षा द्या आणि मग आपण शासनाशी या मुद्यावर भांडू असे सांगून या सर्वांची समजूत काढली. त्यानंतर सर्वजण आपापल्या वर्गात परीक्षा देण्यासाठी गेले. या प्रकरणावरून प्रशासनाने कोणतेच नियोजन केलेले नसल्याचे समोर आले. याचा फटका परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना बसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.