कालवा दुरुस्तीमुळे पाणी सध्या बंद : 26 गावातील 6 हजार शेतकऱयांना लाभ
1953 पासून भारतातील हे शेतकरी स्वतःच मिळवतात पाणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसामच्या शेतकऱयांचे पाणी रोखण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण भूतान सरकारने दिले आहे. गुरुवारी पाणी रोखल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर वेगवेगळय़ा चर्चा विविध माध्यमातून रंगल्या होत्या. तथापि आसामकडे जाणाऱया पाण्याच्या कालव्यांची दुरुस्ती सुरु आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्याकरता ते केले जात आहे. त्यामुळे पाणी थांबले असल्याचा खुलासा तत्काळ केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूतानने आसामला कालव्यांद्वारे देण्यात येणारे पाणी रोखल्याचे वृत्त बरोबर नाही, असे म्हटले आहे. तथापि याबाबत गुरुवारी वृत्त प्रसारित झाल्यानंतर चीन, नेपाळनंतर आता भूताननेही भारताला रोखल्याची चर्चा समाजमाध्यमांवरून सुरु झाली होती. आसाममधील बक्सा जिल्हय़ातील शेतकऱयांना भूतानमधून पाणी पुरवले जाते. 26 गावातील सुमारे 6 हजार शेतकरी जलसिंचनासाठी भूतानमधील डोंग परियोजनेवर अवलंबून आहेत. 1953 पासून धानच्या शेतीसाठी भूतानमधीलच पाणी वापरले जात आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून हे पाणी बंद झाल्याने बक्सा जिल्हय़ातील शेतकऱयांनी निदर्शने सुरु केली होती. तसेच रास्तारोकोही केला. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन भूतानकडून त्वरीत पाणी सुरु करावे, अशी मागणी केली होती. या जिल्हय़ातील शेतकरी स्वतःच भारत-भूतान सीमेवर जाऊन नदीच पाणी आसामला मिळेल, अशी व्यवस्था करतात. परंतु सध्या कोरोना साथीमुळे प्रवेश बंद करण्यात आल्याने पाणी मिळणार नाही, असे मानले जात आहे. आसामचे मुख्य सचिव संजय कृष्ण यांनीही माध्यमांतील हे वृत्त फेटाळून लावले आहे. कालव्यांची दुरुस्ती करुन आसामला पाणी सुरळीत मिळत रहावे, अशी व्यवस्था केली जात असल्याचे आणि भूतानकडून मदतच मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भारत आणि भूतान दरम्यान काही विवाद निर्माण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.