आसाममध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप ः काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये बुधवारी सकाळी 6.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार भूकंपाचा हा धक्का सकाळी 7.51 वाजता बसला आहे. या भूकंपाचे केंद्र सोनितपूर जिल्हय़ात होते. या भूकंपामुळे ईशान्य भारतासह उत्तर बंगालच्या अनेक भागांमध्येही तीव्र धक्के जाणवले आहेत. आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनीही सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. गुवाहाटीसह अनेक ठिकाणांवरून भिंती कोसळण्यासह भिंतीना मोठय़ा भेगा पडल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. दिलाशाची बाब म्हणजे भूकंपात कुठलीच जीवितहानी झालेली नाही.
लोक सुखरुप रहावेत यासाठी प्रार्थना करत सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. भूकंपाविषयी सर्व जिल्हय़ांमधून तपशील मागविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
6 तीव्रतेचा भूकंप धोकादायक
भूगर्भशास्त्रज्ञांनुसार भूकंपाचे मूळ कारण टेक्टोनिकल प्लेट्समध्ये होणाऱया वेगवान हालचाली आहे. याचबरोबर उल्का प्रभाव आणि ज्वालामुखी विस्फोट, माइन टेस्टिंग आणि आण्विक चाचणीमुळे देखील भूकंपाचे धक्के जाणवतात. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते. या स्केलवर 2.0 किंवा 3.0 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का सौम्य असतो. तर 6 तीव्रतेचा अर्थ शक्तिशाली भूकंप असा होतो.