पाणी गळतींचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष : पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा शहराला पाणीटंचाई भासणार नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येते. यंदाही प्रशासनाने ही बाब जाहीर केली. परंतु एल ऍण्ड टी कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासियांना सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुर्दैवाने याचे गांभीर्य या कंपनीला नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात सतत पाणीटंचाई नेहमीचीच ठरली आहे. आठ दिवसांपूर्वी विजयनगर-पाईपलाईन रोड येथे पाईपलाईनला भलीमोठी गळती लागली. याबद्दल सर्वच माध्यमांनी वृत्तांकन केले. समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाले. परंतु एल ऍण्ड टी कंपनीला आठ दिवसांनंतर जाग आली.
ही गळती दुरुस्त करेपर्यंत कॅम्प येथे पाईपलाईनला गळती लागली आणि टिळकवाडी व कॅम्प परिसराचा पाणीपुरवठा खंडित झाला. गेल्या आठ दिवसांपासून टिळकवाडी व कॅम्प येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. अजून मार्च उजाडला नाही तोच शहरात टँकर फिरू लागले आहेत. याचे कारण पाणीटंचाई नसून एल ऍण्ड टी कंपनीचा बेजबाबदारपणा आहे.
हेस्कॉमने विद्युतपुरवठा खंडित केल्याने पाण्याचा उपसा करण्यामध्ये व्यत्यय आला आहे, असे एक नेहमीचेच कारण एल ऍण्ड टी पुढे करते. परंतु शहरात सर्वत्र सतत उद्भवणाऱया गळतीची समस्या कंपनीने दूर करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने महानगरपालिकेने एल ऍण्ड टीला पाणी पुरवठय़ाबद्दलची पुरेशी माहिती व वितरण याबाबत प्रशिक्षणच दिले नसल्याने समस्यांमध्ये भर पडत आहे.
अधिकारी गैरसोयीसाठीच?
एल ऍण्ड टीने पाणीपुरवठा विभागाची सूत्रे घेतल्यापासून शहरात कोठे ना कोठे पाणीटंचाई उद्भवत आहे. टँकरचे दर गरिबांसह सर्वसामान्यांनाही परवडण्याजोगे नाहीत. त्यामुळे एकूणच शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तथापि ना कंपनी, ना महानगरपालिका, ना प्रशासन कोणालाच जनतेला सोसाव्या लागणाऱया गैरसोयींची कल्पना आलेली नाही. शिवाय कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱयांना फोन केला असता फोन स्वीकारला जात नाही. समाधानकारक उत्तरेही मिळत नाहीत. त्यामुळे अधिकारी नागरिकांच्या सोयीसाठी आहेत की गैरसोयीसाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज पाणीपुरवठा सुरळीत होईल
कंपनीचे व्यवस्थापक सुहास कामत यांच्याशी संपर्क साधता त्यांनी हेस्कॉमकडून वीज खंडित झाल्याने व जलवाहिनीला गळती लागल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. कॅम्पमधील जलवाहिनीची दुरुस्ती मंगळवारपर्यंत पूर्ण होईल व बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.
– सुहास कामत, व्यवस्थापक एल ऍण्ड टी