तवंदी घाटातील दुर्घटना : वाहनाचे मोठे नुकसान
वार्ताहर /तवंदी
मिरचीवाहू कंटेनर पलटी झाल्याने त्यातील दोन चालक जागीच ठार झाल्याची घटना तवंदी घाटातील दुसऱया वळणावर रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महावीर जैनर (वय 27, रा. पतीहाळ केबी, तालुका-बैलहोंगल) व विनायक खेत्राप्पा कुंभार (वय 22) अशी मृत चालकांची नावे आहेत. सदर अपघातात वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, महावीर जैनर व विनायक कुंभार हे कंटेनर क्रमांक केए 63-6031 मधून मिरची भरून बडोदा (गुजरात) च्या दिशेने जात होते. दरम्यान, तवंदी घाटात कंटेनर आल्यानंतर चालक महावीर याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरची दुभाजकाला जोराची धडक बसली. त्यानंतर वाहन पलटी झाले. त्यात महावीर व विनायक जागीच ठार झाले.
सदर घटनेची माहिती समजताच जय हिंद कंपनीचे कर्मचारी प्रकाश बामणे, अमोल नाईक व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मदतकार्य सुरू केले. कंटेनरखाली सापडलेला विनायक याचा मृतदेह कसोशीने बाहेर काढला. तर महावीरचा मृतदेह कंटेनरच्या खाली सापडला होता. तो जेसीबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करुन काढण्यात आला. दोन्ही मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी निपाणी शहर उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर, एएसआय एस. के. नरेगल व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
काहीकाळ वाहतूक विस्कळीत
घटनास्थळी वाहनधारक व नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर संकेश्वर येथील अग्निशमन दलाने कंटेनरमधील महामार्गावर पडलेले डिझेल स्वच्छ केले. महावीर याच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. तर विनायकबाबत अधिकची माहिती समजू शकलेली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.