प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. यामुळे मंदिर आणि या ठिकाणी असलेल्या कपिलतीर्थाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, कपिलेतीर्थाची देखभाल करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आल्याने दुरवस्था झाली आहे. टाकण्यात येणारा कचरा काढण्यात आला नसल्याने कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
कपीलतीर्थाला पवित्र मानले जाते. यामुळे पूजेसाठी वापरण्यात आलेली फुले आणि हार असे निर्माल्य कपीलतीर्थामध्ये विसर्जित करण्यात येते. पण तलावामधील पाणी दूषित होत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. तलावातील पाणी वारंवार बदलणे महापालिकेला डोकेदुखीचे बनले आहे. तलावाचा दुरुपयोग होत असल्याने महापालिकेने तलावामध्ये पाणी भरण्याचे बंद केले आहे. तर नैर्माल्याचे विसर्जन करण्यासाठी निर्माल्य कुंड ठेवण्यात आले आहे. मात्र नागरिक या कुडांचा वापर करण्याऐवजी तलावामध्ये निर्माल्य विसर्जित करीत आहेत. हे निर्माल्य महापालिकेच्यावतीने काढण्यात येत नाही. परिणामी तलावाला कचरापुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कचऱयाची उचल वेळेत करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला असून महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तलावामध्ये विसर्जित करण्यात आलेले निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून टाकण्यात येत आहे. यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. विशेषत: पवित्र म्हणून पाहण्यात येणाऱया तलावाची दुरवस्था झाली असून याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार असल्याची टीका नागरिक करीत आहेत. तलावामध्ये कचरा कुजत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तलावाची स्वच्छता हाती घेऊन कपीलतीर्थाचे पावित्र्य जपावे. तलावामध्ये निर्माल्य विसर्जित करण्यास प्रतिबंध घालण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.