रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक-अनब्लॉक; ‘कू’वर शेअर केला स्क्रीनशॉट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नव्या आयटी नियमांबाबत केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांचा फटका केंद्रीय कायदा आणि माहिती-तंत्रज्ञान (आयटी) मंत्री रविशंकर प्रसाद यांना बसला आहे. ट्विटरने नुकतेच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक केले. मात्र तासाभरानंतर मंत्र्यांचे अकाऊंट अनब्लॉक करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर नेत्यांच्या खात्याची ब्लू टिक हटवली होती. तक्रार केल्यानंतर ब्लू टिक पुन्हा देण्यात आली होती.
आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी एक तास ब्लॉक होते. ट्विटरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट रविशंकर प्रसाद यांनी ‘कू’ या सोशल मीडिया ऍपवर शेअर केला. त्यात त्यांनी एका तासापासून ट्विटरने आपले अकाऊंट ब्लॉक केले आहे, असे म्हटले आहे. ट्विटरने याबाबत खुलासा करताना मंत्र्यांनी पॉलिसीचे उल्लंघन केला असल्याचा दावा केला आहे. मात्र अधिकृत काही उत्तर दिलेले नसल्यामुळे यासंदर्भात ट्विटरकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करत, मित्रांनो! आज अत्यंत विचित्र काहीतरी घडले. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपानुसार ट्विटरने मला लॉगीन करण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर जवळपास एका तासानंतर त्यांनी खाते अनब्लॉक केल्यानंतर लॉगीन करता आल्याचे त्यांनी सांगितले. ट्विटरची ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 च्या नियम 4(8)चे उल्लंघन ठरते. ट्विटरने माझ्या खात्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यासंबंधीची नोटीस द्यायला हवी होती, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ट्विटरवर करण्यात येणाऱया कारवाईसंदर्भातील वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरसंबंधात विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या क्लिपचा परिणाम समोर आला आहे, असा दावाही त्यांनी केला.
नव्या आयटी धोरणांचे समर्थन
ट्विटरनं केलेली कृती ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या बाजूने नसल्याचे समोर आले आहे. त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा असल्याचे वारंवार दिसून येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोणत्याही प्रकारे नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लागू करण्यात आलेले नियम मान्य करावे लागतील, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगत नव्या आयटी धोरणांचे जोरदार समर्थन केले आहे.
केंद्र सरकार-ट्विटर वाद चिघळणार आपल्या अकाऊंटवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर ट्विटरद्वारा करण्यात आलेली कारवाई आयटी ऍक्टचे उल्लंघन असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ट्विटरचे धोरण योग्य नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. ट्विटरच्या या नव्या कुरापतीनंतर आता ट्विटरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्मयता आहे. रविशंकर यांनी आधी देखील ट्विटरच्या नियमांना डबल स्टँडर्ड म्हटले होते. अमेरिकेसाठी ट्विटरचे नियम वेगळे आणि भारतासाठी वेगळे, असेही त्यानी स्पष्ट केले होते. आता या घटनेमुळे पुन्हा भारत सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद अधिक चिघळण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.