चौघांजणांना वीजेचा जोरदार धक्का
शाहुवाडी / प्रतिनिधी
आरूळ ता.शाहूवाडी येथे पावसापासून बचाव करण्यासाठी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली आश्रय घेतलेल्या चौघावर अचानक वीजेच्या कडकडाटासह विजेचा लोळ आला. चौघांचे दैव बलवत्तर म्हणून जीव वाचले. अचानक पडलेल्या सर्वांचीच भितीने गाळण उडाली.
मंगळवारी सांयकाळच्या दरम्यान अवकाळी पाऊस व वीजेचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान ऊस भरण्यासाठी आलेल्या चौघांनी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आश्रय घेतला. याचवेळी जोराने वीजेच्या कडकडाटासह वीजेचा लोळ ट्रॅक्टरवर पडला .ट्रॉली खाली आश्रय घेतलेले शिवाजी हरी पाटील, अंजना केशव पाटील, निवास रामचंद्र पाटील सर्वजण रा.आरूळ व प्रकाश विठ्ठल आगलावे रा.आंबर्डे पैकी आंबेवाडी ह्या चौघांजणांना वीजेचा जोरदार धक्का बसला. यात चौघे ही जखमी झाले असून त्यांचे शरिर ढिले पडले आहे. घटनेची माहीती मिळताच त्यांना गावचे पोलिस पाटील राजेश पाटील यांनी तात्काळ उपचारांसाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. ट्रक्टरमध्ये ऊस नसता तर मोठा अनर्थ घडला असता.त्यांचे दैव बलवत्तर म्हणून जीव वाचले. याची नोंद उशीरा शाहूवाडी पोलिसांत झाली आहे