प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत बाळकृष्ण होडारकर यांनी कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष असलेल्या विश्वास सावंत यांना एका मताने हरविले होते. त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आंत वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे पराभूत उमेदवार सावंत यांनी आपल्या पॅनलसोबत बैठक घेऊन होडारकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला. याबद्दल तसेच याकामी स्थानिक आमदार असलेल्या काब्राल यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि ज्या नगरसेवकांनी अविश्वास ठरावावर सहय़ा केल्या आहेत त्यांच्या भूमिकेवर कुडचडेत तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या आधी पॅनल जाहीर केले असते, तर अविश्वास ठरावाची वेळ आली नसती. रीतसर निवडणुकीत विजयी होऊन नगराध्यक्ष बनलेल्यावर लगेच अविश्वास ठराव आणणे हे खालच्या स्तराचे राजकारण झाले अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत.
लज्जास्पद प्रकार : आनंद प्रभुदेसाई
नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणाऱया सभागृहात मंत्र्यांनी येऊन बसणे व मतदान करण्यासाठी जाणाऱया नगरसेवकांना डोळे वटारून पाहणे हा एक प्रकारे दबावाचाच प्रकार आहे. तरी काही नगरसेवकांनी न घाबरत सत्याच्या बाजूने राहून मतदान केले व समोरासमोर उत्तर दिले. याची स्थानिक आमदारांनी नोंद घ्यायला हवी होती. पण निर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा सुद्धा न देता आपल्या कार्यालयात जाऊन निवडून आलेल्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आणण्याचा सल्ला देणे याहून घाणेरडी विचारसरणी आजपर्यंत कधी पाहिलेली नाही. जो प्रकार घडलेला आहे तो स्थानिक आमदारांबरोबर कुडचडेतील जनतेसाठी लज्जास्पद आहे, अशी टीका माजी नगरसेवक आनंद प्रभुदेसाई यांनी केली आहे.
त्यानंतर वीजमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुडचडेतील नगरसेवकांना नीतिशास्त्र माहीत नाही, असे उद्गार काढले. पण गेली दहा वर्षे नीतिशास्त्र माहिती नसलेल्यांनीच त्यांना या खुर्चीवर बसविलेले आहे हे त्यांच्या कदाचित लक्षात नसेल. त्याचबरोबर कुडचडे भाजप मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याबरोबर चालत असलेल्यांनाच गद्दार म्हटले आहे. विश्वास सावंत यांनी दुसऱयांना गद्दार म्हणण्यापूर्वी आपल्या पायाकडे एकदा पाहावे व भाजपसाठी कोणते काम केले आहे ते लोकांना उघडपणे सांगावे, असे प्रभुदेसाई यांनी म्हटले आहे.
पारदर्शक राजकारण जमत नसल्यास सोडावे : सावंत
दहा वर्षे राजकारणात असलेली व्यक्ती कायदामंत्री असून सुद्धा अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण करून निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांवर दबाव घालते, उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तसेच जबरदस्तीने अविश्वास ठरावावर सही करण्यास भाग पाडते. हे पाहता असे वाटू लागले आहे की, नीलेश काब्राल यांनी आजपर्यंत कुडचडेत स्वार्थासाठीच सत्ता गाजविल्याचे जनतेला स्पष्ट करून दिलेले आहे. तरीही त्यांनी सुधारावे व पारदर्शक राजकारण जमत नसल्यास ते सोडून द्यावे, असे कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत यांनी म्हटले आहे.
मर्यादा ओलांडली : हर्षद गावस देसाई
गुरुवारी जो प्रकार कुडचडेत घडला त्याहून राजकारणाशी संबंधित लज्जास्पद गोष्ट याअगोदर कधीच कुडचडेत घडलेली नाही. लोकशाहीचा गैरवापर करून दबाव टाकणे म्हणजे मर्यादा ओलांडणे आहे. सर्वांनी एकत्र होऊन याला आताच थांबविण्याची गरज आहे. ज्या प्रकारे बरोबर घेऊन आलेल्या नगरसेवकांनीच अविश्वास दाखविला व पुढे केलेल्या उमेदवाराचा पराभव केला त्यावरून तरी मंत्री नीलेश काब्राल यांनी हा एक प्रकारचा इशारा आहे हे समाजायला हवे, असे हर्षद गावस देसाई यांनी म्हटले आहे. असे राजकारण करणाऱयांना त्यांची खरी जागा दाखविण्याची वेळ आलेली आहे. नगरसेवकांनी कोणाच्याच दबावाखाली न येता लोकांना सेवा द्यावी आणि स्वतःच्या सिद्धांतानुसार निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
हर्षद गावस देसाई
नगरसेवकांनी दबावाला बळी पडू नये : प्रतीत प्रभुदेसाई
कुडचडे पालिका निवडणुकीत आपणही एक उमेदवार होतो व आपल्याला थोडी कमी मते पडल्यामुळे आपला विजय होऊ शकला नाही. त्याचे आपल्याला जास्त वाईट वाटत नसून गुरुवारी स्थानिक आमदार असलेल्या कायदामंत्र्यांनी जी कृती केली ते बघितल्यास निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांनी गुरांप्रमाणे वागणूक दिलेली आहे. हे योग्य नाही. कोणत्या स्वार्थापोटी त्यांनी अशी कृती केली ते आपल्याला माहिती नाही. पण अशा दबावाला नवीन नगरसेवकांनी बळी न पडता आपला स्वाभिमान राखून ठेवण्याची आणि तटस्थपणे उभे राहण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रतीत प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे.