प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी ते गोव्यातील वेर्णा या कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण पूर्ण झालेल्या अंतिम टप्प्यातील रेल्वे मार्गावर सीआरएस तपासणी सुरु झाली असून ही तपासणी आज 24 मार्चपर्यंत चालणार आहे. रेल्वेसुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वात ही सीआरएस तपासणी सुरू आहे. आज गुरुवारी रात्री सीआरएस स्पेशल ट्रेन रत्नागिरी येथून सोलापूरला रवाना होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या 6-7 वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. मुंबई ते रोहा असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाडय़ा आणि पॅसेंजर रेल्वे विद्युत इंजिनावर चालवली जाते. आता रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. रेल्वेसुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखाली 22 पासून सुरू झालेली रेल्वे विद्युतीकरणाची तपासणी आज 24 मार्चपर्यंत चालणार आहे. यासाठी 7 बोगींच्या विजेवरील विशेष गाडीद्वारे कोकण रेल्वे मार्गावर पाहणी केली जात आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद होईल. याशिवाय डिझेल खर्चात कपात होऊन प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे.
रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या तपासणीदरम्यान रत्नागिरी ते वेर्णा मार्गावरील पानवल पूल, निवसर आडवलीदरम्यानचे रेल्वे वळण, आडवली यार्ड, बेर्डेवाडी टनेल, विलवडे-सौंदळ दरम्यानचे डोंगर कटींग, राजापूर एसएसपी, वैभववाडी अचिर्णे दरम्यानचे एलसी गेट, कणकवली टीएसएस आणि ओव्हरहेटड वायर डेपो, कणकवली-सिंधुदुर्ग दरम्यानचे एलसी गेट 25, सिंधुदुर्ग-कुडाळदरम्यान कर्ली नदी पूल, झाराप एसपी, पेडणे टनेल यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अधिकारी, अभियंत्यांना या मार्गावरील विद्युतीकरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या सूचना केल्याचे सांगण्यात आले.