नवी दिल्ली :
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व रेल्वेगाडय़ात योग्य वेळेत इच्छितस्थळी पोहोचल्या आहेत. 1 जुलै रोजी सर्व रेल्वेगाडय़ांनी वक्तशीरपणा दाखविल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व रेल्वेंनी 100 टक्के वेळ पाळली आहे. सर्व रेल्वेगाडय़ा वेळेवर धावत आहेत. तर 23 जून रोजी 99.54 पंक्चुअलिटी प्राप्त करण्यात आली होती, त्या दिनी केवळ एका रेल्वेगाडीला विलंब झाला होता.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त करणारा ट्विट केला आहे. रेल्वेगाडय़ांनी स्वतःचा वेग राखल्याने सेवांमध्ये सुधारणा होत आहे. कोरोना संकटादरम्यान लागू असलेल्या लॉकडाउनमध्ये रेल्वे लोकांना घरापर्यंत पोहोचण्यास उपयुक्त ठरल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. कोरोना संकटामुळे अद्याप रेल्वेची नियमित सेवा सुरू झालेली नाही. नियमित सेवेवर 12 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु 230 मेल आणि विशेष एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत. 12 ऑगस्टपर्यंत रद्द राहणाऱया रेल्वेंचे तिकीट आरक्षित करणाऱया प्रवाशांना 100 टक्के परतावा दिला जात आहे.