राजेंद्र शिंदे/ चिपळूण
कोल्हापूरच्या लाल मातीत कुस्तीची मैदाने, आखाडे गाजवणारे चांदेकरवाडीचे पैलवान आणि चिपळूणचे वनरक्षक रामदास खोत यांनी वनसेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावत ‘सुवर्ण’भरारी घेतली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून निसर्ग व वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण केल्याबद्दल शासनातर्फे दिल्या जाणाऱया सुवर्णपदकासाठी राज्यातील 9 हजार वनरक्षकांमधून निवड झालेल्या तिघांमध्ये खोत यांचा समावेश आहे. यानिमित्ताने जिह्यालाही सुवर्णपदकाचा प्रथमच बहुमान मिळाला आहे.
कुस्तीपटूंच्या आखाडय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या चांदेकरवाडीतील रामदास खोत यांचा 4 एप्रिल 1987चा जन्म. त्यांच्यावर लहानपणापासून कुस्तीचे संस्कार झाले. तेथील मातीत हा पठ्ठय़ा चांगलाच रमला. कुस्तीचे अनेक आखाडे या मर्दाने गाजवले. राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु, मनाच्या एका कोपऱयात कुठेतरी निसर्गाची आवड रुजत होती. त्याला कारणीभूत होते राधानगरीचे अभयारण्य. खोत आपल्या मित्रांसमवेत राधानगरीच्या दऱयाखोऱयांमध्ये ट्रेकिंगला जात. यातूनच त्यांनी वनविभागात दाखल होण्याचे निश्चित केले. वनविभागाच्या 2006मधील भरतीप्रक्रियेत त्यांची क्रीडा कोटय़ामधून निवड झाली आणि कोकण पट्टय़ात ते वनरक्षक म्हणून रुजू झाले.
गेली 14 वर्षे वनसेवेत असलेल्या खोत यांचा मानवी वस्तीत शिरणाऱया प्राण्यांना अत्यंत चपळाईने पकडून त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यामध्ये हातखंडा. मानवी वस्तीत आलेल्या तब्बल 50हून अधिक मगरींना पकडून त्यांनी त्यांना जीवदान दिले आहे. त्यासाठी त्यांनी एक मोठा लोखंडी पिंजरा तयार केला. तत्पूर्वी त्याची रचना कशी असावी, याबद्दल अभ्यासही केला. महत्वाचे म्हणजे आजवर केलेल्या बचावकार्यात एकदाही मगरीने त्यांच्यावर हल्ला केलेला नाही. त्यामुळे राज्यात त्यांना ‘महाराष्ट्राचा क्रोकोडाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
खोत सध्या चिपळुणातील आबलोली परिक्षेत्रात कार्यान्वित आहेत. 2015-1ग्न6मध्ये विनापास वाहतूक होणारे लाकूड जप्त करत 13 वनगुन्हे प्रकरणातून शासनाला 65 हजारांचा वाहतूक दंड मिळवून देतानाच वनसंपत्तीची लूट थांबवण्याचे कार्य त्यांनी केले. ऑक्टोबर 2015मध्ये अलोरे येथे बिबटय़ाच्या कातडय़ासह आरोपीस अटक करण्याची कारवाई केली. जानेवारी 2017मध्ये गोवळकोट परिसरात 13.796 टन रक्तचंदन पकडण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे 28 कोटीचे रक्तचंदन असलेल्या या प्रकरणातील मूळ सूत्रधार आरोपीस पकडून देण्याचे कामही केले. मानवी वस्तीत शिरलेल्या आणि संकटात सापडलेल्या मगरी, साप, खवलेमांजर, बिबटे, रानगवे, भेकर, उदमांजर, घोरपड, घार, माकड अशा एकूण 262 वन्यजीवांच्या संरक्षणाचे कामही त्यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.