वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात गावागावातील शाळांमध्ये मुंबई, पुणे येथून आलेले चाकरमानी क्वारंटाईन आहेत. ही संख्या अडीच हजारच्या घरात आहे. काही चाकरमानी आपल्या गावच्या शाळेत स्वत:चे घर समजून साफसफाई अन् परसबागेची देखभाल करत आहेत. सांगेली प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन दांपत्याने शाळेच्या आवारात पालेभाजी पीक घेतले. सांगेली शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता शिर्के यांनी या चाकरमान्यांचे कौतुक केले. शिरशिंगे-गोठवेवाडी शाळेतही क्वारंटाईन व्यक्ती वेगळेपण जपत आहेत.
गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात 2 हजार 500 चाकरमानी क्वारंटाईन आहेत. काहींना होम क्वारंटाईन केले आहे. शाळांमध्ये शिक्षक, कर्मचारी त्यांची देखभाल करत आहेत. शनिवारी 99 चाकरमानी दाखल झाले. आता चाकरमानी येण्याचे
प्रमाण कमी होत आहे, असे प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीत स्वॅब संकलन केंद्र सुरू आहे. 16 मेपासून नमुने घेण्यात येत आहेत. 17 मेपर्यंतच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मात्र, अन्य अहवाल येणे बाकी आहेत, असे अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात स्वॅब संकलन केंद्र आहे. तेथे डायलेसीस सेंटरही आहे. ते अन्य ठिकाणी हलविण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.