प्रथम 50 लाख व नंतर 1 कोटीची मदत केल्यानंतर आता कोरोनाग्रस्तांसाठी वेतनही देण्याची घोषणा,
देशातील सर्व नागरिकांना सहकार्याचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढय़ात प्रत्येक जण केंद्र आणि राज्य सरकारला मदत करत आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरने आपण पुढील दोन वर्षाचा पगार घेणार नाही, अशी गुरुवारी शपथ घेतली आणि ती रक्कम पंतप्रधानांच्या मदतनिधीमध्ये दान केली. विशेष म्हणजे, गत आठवडय़ात कोरोनाग्रस्तांसाठी गंभीरने खासदार निधीतून 50 लाख आणि नंतर एक कोटी रुपये दिले होते. आता, गुरुवारी गंभीरने पुढील दोन वर्षाचा पगार पंतप्रधान मदत निधीला देण्याची घोषणा केली आहे.
2 एप्रिल 2011 मध्ये टीम इंडियाने 28 वर्षांचा दुष्काळ संपवत आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. गंभीरने प्रतिकूल परिस्थितीत 97 धावांची खेळी साकारली आणि टीम इंडियाला विजयाच्या जवळ नेले. आजच्या या तारखेला आणखी संस्मरणीय करण्यासाठी गंभीरने आपला दोन वर्षाचा पगार पंतप्रधान रिलीफ फंडाला देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, गंभीरने कोरोनाविरुद्ध लढाईत मोलाचे योगदान दिले आहे. गत आठवडय़ापासून तो कोरोनाग्रस्तांसाठी जमेल त्या परीने मदत करत आहे.
‘लोक स्वतःसाठी नेहमीच काही ना काही तरी करत असतात. पण, देशाच्या कठीणमय काळात आपण काय करु शकता, हा प्रश्न आहे. मी माझा दोन वर्षाचा पगार पंतप्रधान केअर फंडामध्ये जमा करत आहे. गंभीरने केवळ दोन वर्षाचा पगार देण्याची घोषणाच केली नाही तर देशातील सर्व नागरिकांना मदत आणि सहकार्याचे आवाहन केले आहे.
दोन वर्षाचे वेतन पंतप्रधान मदतनिधीला
भारतीय संसदेत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱया एका खासदाराच्या महिन्याचे मूळ वेतन 1 लाख रुपये आहे, त्यांना मतदारसंघ भत्ता आणि संसद भत्ता असे प्रत्येकी 45 हजार रुपये दिले जातात. याशिवाय, संसद अधिवेशन भत्ता दिवसाला 2000 रुपये मिळतो. यामुळे एका महिन्यात एका खासदाराला 1 लाख 92 हजार रुपये वेतन मिळते. गंभीरने पुढील दोन वर्षासाठी आपला पगार कोरोनाग्रस्तासाठी मदतनिधी म्हणून जमा केला आहे.
याआधी, गत आठवडय़ात गंभीरने खासदार निधीतून दिल्ली सरकारच्या केअर फंडमध्ये 50 लाख तसेच पंतप्रधान केअर फंडमध्ये 1 कोटी रुपये दिले होते. आता, देशातील चिंताजनक परिस्थिती पाहता आणखी पुढे जात पुढील दोन वर्षासाठीचे वेतन दान करत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याशिवाय, गंभीरची गंभीर फौंडेशन ही स्वयंसेवी संस्था दिल्लीतील गरजू व्यक्तींना अन्नाची पाकिटांचे वाटप करत आहे.