देवाची आण घालून भावकी वेठीला.कारवाईची गरज
वार्ताहर / औंध
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांनी निवडून येण्यासाठी मतदाराबरोबरच देवांना देखील पाण्यात घातले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कुडमुड्या ज्योतिषाचा देखील भाव वधारला आहे.
कोणतीही निवडणूक असली की इच्छुक उमेदवारांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा उफाळून येतात. अगदी अर्ज भरण्यापासून निवडणुकीत कोणता रंगाचा गणवेश परिधान करायचा. मतदानाची सुरवात कोणी करायची याबद्दल देवऋषी आणि ज्योतिष्यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानून उमेदवारांचे पान देखील हलत नाही. अगदी महाराजांनी सांगितल्यानुसार एखादी घटना जरी मनाविरुद्ध घडली तरी मनात शंकेची पाल कुचकुचते. लगेच त्यावर उतारा अंगारा याचा भडीमार सुरू होतो. हातात गळ्यात मानाचे दोरे गंडे बांधून उमेदवार अंधश्रद्धेला खुलेआम कवटाळत असल्याचे चित्र सध्या निवडणुकीत दिसून येत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मनावर बसलेले अंधश्रद्धेचे भूत बाजूला काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ग्रामीण भागात मात्र अंगारे आणि धुपाऱ्याची चलती आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार मतदारावर साम दाम दंड भेद नितीचा वापर करीत असले तरी अंतिम क्षणी महाराजांनी दिलेली अंगाऱ्याची पुडी खिशात ठेवायला विसरत नाहीत. निवडणूक काळात उफाळून येणाऱ्या अंधश्रद्धेला मूठमाती देणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी लोकांची लुबाडणूक करणारे बाबा, महाराज मौलवी भोंदू यांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीला सहकार्य करण्याची गरज आहे.
एककट्टा मतासाठी अंगारा
अनेक गावात भावकीच्या मताचा मोठा गठ्ठा असतो. हे मतदान एककट्टा होण्यासाठी सध्या उमेदवारांकडून गुलाल, भंडारा, विभूती उचलून शपथी घेण्यास मतदारांना भाग पाडले जात आहे. कुलदैवत आणि कुलस्वामिची शपथ घालून मानसिक दबाव टाकण्याची शक्कल उमेदवार लढवीत आहेत.