कोकण रेल्वे मार्गावर आजपासून गाडय़ा : आगाऊ आरक्षण बंधनकारक : कोकण रेल्वेची अधिकृत घोषणा : पाच सप्टेंबरपर्यंत 162 फेऱया
प्रतिनिधी / बांदा:
गणेशोत्सव कालावधीत कोकणात मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी येतात. मात्र, रेल्वे मार्गावर पेडणेजवळ दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती. मात्र, रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाडय़ांची घोषणा करून चाकरमान्यांना सुखद धक्का दिला आहे. 15 ऑगस्टला पहिली गाडी सुटणार आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत सुटणाऱया 162 गाडय़ांची घोषणा करण्यात आली असून त्यात 81 अप तर 81 डाऊन गाडय़ांचा समावेश आहे. शनिवारी 15 ऑगस्टपासून याबाबतचे बुकिंग सुरू होणार आहे. या गाडय़ा पूर्णपणे आरक्षित असतील.
या सर्व गाडय़ा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून कोकणात येण्यासाठी तर सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरी येथून मुंबईसाठी धावणार आहेत. प्रवाशांनी ‘कोरोना’बाबत आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
गणपती स्पेशल गाडय़ांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- सीएसएमटी ते सावंतवाडी 16 फेऱया, यामध्ये 01101 सीएसएमटी स्पेशल गाडी 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत सीएसएमटीहून रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणार असून दुसऱया दिवशी 9.30 वा. सावंतवाडीत पोहोचणार आहे. तर 01102 ही गाडी 16 ते 23 ऑगस्ट या कालावधीत सावंतवाडीहून सकाळी 10.19 वाजता सुटणार असून रात्री 9.40 ला सीएसएमटीवर पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबा आहे.
एलटीटी-कुडाळ स्पेशल
एलटीटीवरून कुडाळसाठी 01103 या एलटीटी स्पेशल गाडीच्या 16 फेऱया आहेत. 01103 ही गाडी 15 ते 22 ऑगस्टपर्यंत एलटीटीवरून रोज रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटणार असून दुसऱया दिवशी 10.30 वाजता कुडाळ येथे पोहोचणार आहे. तर कुडाळ स्थानकावरून 01104 ही गाडी 16 ते 23 ऑगस्टपर्यंत दुपारी 12 वाजता सुटणार असून त्याच दिवशी रात्री 11 वाजता एलटीटीवर पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकावर थांबा आहे.
सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशल
सीएसएमटीवरून सावंतवाडी रोडपर्यंत 01105 या स्पेशल गाडीच्या 16 फेऱया 15 ते 22 ऑगस्टदरम्यान सुटणार आहेत. ही गाडी रात्री 10 वाजता सुटणार असून दुसऱया दिवशी सकाळी 8.10 वाजता सावंतवाडीत पोहोचणार आहे. तर 011106 ही सावंतवाडीहून 16 ते 23 ऑगस्टदरम्यान सकाळी 8.50 वाजता सुटणार असून रात्री 8.05 वा. सीएसएमटीवर पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, विलवडे, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबा आहे.
एलटीटी-रत्नागिरी स्पेशल
एलटीटीवरून रत्नागिरीसाठी स्पेशल 16 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. 01107 ही गाडी 15 ते 22 ऑगस्टपर्यंत एलटीटीवरून रात्री 8.30 वा. सुटून दुसऱया दिवशी पहाटे रत्नागिरी येथे पोहोचणार आहे. 01108 ही गाडी रत्नागिरीहून सकाळी 6.30 वा. सुटणार असून दुपारी 2.20 वा. एलटीटीवर पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबणार आहे.
सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशल
सीएसएमटी ते सावंतवाडी रोडपर्यंत 01109 व 01110 या गाडीच्या 24 फेऱया धावणार आहेत. 01109 स्पेशल गाडी सीएसएमटीवरून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी 7.10 वाजता सुटणार असून त्याच दिवशी 7.15 वा. सावंतवाडीत पोहोचणार आहे. तर 01110 ही स्पेशल गाडी सावंतवाडी स्थानकावरून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान रात्री 8.35 वा. सुटणार असून दुसऱया दिवशी 6.45 वा. सीएसएमटीवर पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबे आहेत.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोडपर्यंत 01111 ही स्पेशल गाडी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी 05.50 वाटता सुटणार असून सावंतवाडी रोडवर 16.15 वाजता पोहोचणार आहे.
01112 ही स्पेशल गाडी 6.15 वाजता सावंतवाडी येथून सुटणार असून दुसऱया दिवशी सकाळी 05.50 वा. सीएसएमटीवर पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ या ठिकाणी थांबे आहेत.
एलटीटी-सावंतवाडी स्पेशल गाडय़ा
एलटीटीवरून सावंतवाडी रोड एलटीटी स्पेशल गाडी 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत धावणार आहे. 01113 ही गाडी एलटीटीवरून सकाळी 5.30 वा. सुटणार असून त्याच दिवशी 3.50 वा. सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचणार आहे.
01114 ही गाडी 5.30 वा. सावंतवाडी रोड स्थानकावरून सुटणार असून दुसऱया दिवशी 6.15 वा. एलटीटीला पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबे आहेत.
एलटीटी-रत्नागिरी स्पेशल गाडय़ा
एलटीटीहून रत्नागिरीपर्यंत विशेष गाडी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. 01115 ही स्पेशल गाडी एलटीटीवरून दुपारी 11.55 वा. सुटणार असून त्याच दिवशी रत्नागिरीला सायंकाळी 7 वाजता पोहोचणार आहे. 01116 ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून रात्री 20.30 वा. सुटणार असून दुसऱया दिवशी पहाटे 4.15 वा. एलटीटीला पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबणार आहे.
या सर्व गाडय़ा आरक्षित असून यामध्ये 13 स्लीपर क्लास, सहा सेकंड क्लास सीटींग, एसी 2 आणि एसी 3 टायर कोचचा समावेश आहे. 15 ऑगस्टपासून याचे आरक्षण सुरू होणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.