प्रतिनिधी/ जोयडा
बेकायदेशीर ब्लास्टिंग विरोधात रामनगर येथे माजी मंत्री व आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत जुलॉजीस्ट अधिकारी व तालुका प्रशासन अधिकारी यांना धारेवर धरले. रामनगर जनतेला नुकसान होऊ नये, याकडे सर्व प्रथम लक्ष द्यावे, अन्यथा अधिकाऱयांविरुद्ध कारवाई करू, असे स्पष्ट शब्दात देशपांडे यांनी अधिकारी वर्गांना दिले.
यावेळी सभेत बोलताना आर. व्ही. देशपांडे म्हणाले, रामनगर विस्थापित केंद्र गाव आहे. सुपा धरणासाठी नागरिकांनी घरा-दाराचे, शेतीचे त्याग केल्याने सुपा धरण उभे राहिले आहे. या नागरिकांचे सर्वात मोठे त्याग आहे. याचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. विस्थापित रामनगराचा विकास करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना रामनगरात राबविण्यात येत आहेत.
सध्या रामनगरातील आडाळी भागात 10-12 बेकायदेशीर खाण सुरु आहेत. येथे सरकारने नेमून दिल्या प्रमाणे ब्लास्टिंग होत नाही. याचा जबरदस्त फटका रामनगर जनतेला होत आहे. घरांना, मंदिरांना व सरकारी कार्यालयाना मोठय़ा प्रमाणात ब्लास्टिंगमुळे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई कोण देणार आहे. रामनगर जनतेला सर्व प्रथम संरक्षण मिळाले पाहिजे, याकडे तालुका प्रशासन व पोलीस अधिकाऱयांनी लक्ष द्यावे व याची अंमलबजावणी युद्ध स्तरावर करावी, असे स्पष्ट शब्दात देशपांडे यांनी अधिकाऱयांना ताकीद दिले.
या खाण उद्योगामुळे काही स्थानिकांना रोजगार व ड्रायव्हर यांना काम मिळत आहे म्हणून रामनगर जनतेला त्रास होता कामा नये, या उद्योगामुळे शेती व्यवसाय ठप्प झालेला आहे. या शेतकऱयांना कशा प्रकारे नुकसान भरपाई देणार, अमोनियम व जिलेटीन याचा बेकायदेशीर उपयोग या खाण व्यवसायात होत असल्याने व मोठय़ा प्रमाणात ब्लास्ट होत असल्याने गाईड लाईन्स प्रमाणे ब्लास्टिंग केल्यास नागरिकांना त्रास होत नाही व नुकसान ही होत नाही. जुलॉजीस्ट अधिकारी यांनी नवीन पद्धती प्रमाणे ब्लास्टिंग करण्यास भाग पाडावे अन्यथा जुलॉजीस्ट अधिकारी यास जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट शब्दात आर. व्ही. देशपांडे यांनी सभेत सक्त ताकीद दिले.
यानंतर देशपांडे यांनी दुर्गा गल्ली, कृष्णा गल्ली भागात जाऊन घरांची पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी कॉरी सेफरझोन रद्द करण्याची मागणी व निवेदन सादर केले. यावेळी मल्हार राणे, रमाकांद देसाई, शाम फणीकर, श्रीमती प्रसन्ना देसाई, प्रिया राणे, वंदना जोगी, मंजुनाथ नाईक, अनुजा गावडे, रामू नाईक, ओमकार नाडकर्णी व इतर नागरिक उपस्थित होते.