ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘विरोधकांना जनतेनं नाकारलं आहे आणि आता तेच खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत,’ अशी तोफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर डागली आहे. भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर जगत प्रकाश नड्डा यांचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
ते म्हणाले, जनता हीच आमची खरी शक्ती आहे. निवडणुकांमध्ये जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली आहेत. त्यात खोटं बोलणं आणि अफवा पसरवणं ही दोन शस्त्रे आहेत. हे आतापर्यंत बघत आलो आहोत.
मोदी म्हणाले की, आपण देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे. हेच काम आपल्याला शेवटपर्यंत करायचे आहे. निर्णय घेत असताना प्रत्येकाला काहीना काही अडचणी येतात. पण पक्षाची ध्येय धोरणांचा विसर पडता कामा नये. माझ्या आयुष्यातील सर्वाधिक उर्जादायी काळ मी हिमाचलमधील लोकांमध्ये व्यतित केलाय. त्यामुळे मला विश्वास आहे की जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मुलभूत आदर्श आणि विचार घेऊन एक विशिष्ट उंची गाठेल.