जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उठली
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या कारणास्तव जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या. परंतु सोमवार दि. 9 रोजी राज्य शासनाने या निवडणुकांची स्थगिती उठवली. या निर्णयामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रण ऐन पावसाळ्यात तापणार आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही निवडणूक होण्याची शक्यता असून विद्यमान चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे हे नेमकी काय भूमिका घेणार तसेच संचालक अनिल देसाई हे पक्ष सोडण्याच्या तयारी असून ते काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शेतकऱयांची अर्थवाहिनी म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. खासदार, आमदार येथे संचालक म्हणून राहिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही जिह्यात प्रतिष्ठेची समजली जाते. जिल्हा बँकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नेते मंडळींची सत्ता कायम राहिली आहे. या बँकेच्या निवडणूक मे 2020 मध्ये होणार होती. पण कोरोनाचे संकट असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. गेली पावणे दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्याने या कालावधीत जिल्हा बँकांच्या निवडणुका तब्बल पाच वेळा स्थगित झाल्या होत्या. मुदत संपून मोठा कालावधी उलटल्यानंतरही निवडणूक घेण्यात आली नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. यानंतर कोरोनाच्या दुसऱया लाटेत मोठय़ा प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सरकारने 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला हिरवा कंदील दिला आहे.
सरकारने आता अंतिम मतदार याद्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेची रणधुमाळी आता पुन्हा एकदा सुरू झाल्याने इच्छुकांची धांदल उडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बहुतांश असून सर्व जिल्हा बँकांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश सहकार विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे आता सातारा जिल्हा बँकेच्या स्थगित झालेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे, असे सहकार विभागातून सांगण्यात आले.
काँग्रेस विरुद्ध भाजप; शिवेंद्रसिंहराजे यांची भूमिका काय?
जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे हे भाजपमध्ये आहेत. त्यांच्याकडे मतदार संख्या जास्त आहे. परंतु त्यांची अन् राष्ट्रवादीची जास्त सलगी असल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे. त्यांच्या भूमिकेवर भाजपची पुढची रणनिती ठरणार असल्याचे समजते.
अनिल देसाई पक्ष बदलणार?
जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीतुन भाजपमध्ये गेले होते. त्या निवडणुकीच्या वेळी ते विद्यमान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात काम केल्याची चर्चा त्या वेळी रंगत होती. तसेच येऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकी पूर्वी अनिल देसाई हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्याचा भाजपला फटका बसणार आहे, अशी चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक बदल होणार आहेत.
शिक्षक बँकेची निवडणुकीला का अडचण?
जिह्यात कोरोना असताना कृष्णा कारखाना निवडणूक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पार पडली. आता जिल्हा बँकेची स्थगिती उठवली असून शिक्षक बँकेची मुदत संपली आहे. ती घेण्यात सरकारला अडचण काय?, असा सवाल उपस्थित होत असून याही बँकेची निवडणूक प्रक्रियावरील स्थगिती उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.