जिल्ह्यातील 5 हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल आठवड्याभरात जाहीर केला जाणार आहे. यामुळे टीईटी दिलेल्या परीक्षार्थींची धाकधूक वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 6 हजार 201 परीक्षार्थींनी टीईटी दिली होती. पुढीलवर्षी पुन्हा शिक्षक भरती केली जाणार असल्याने टीईटीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
6 नोव्हेंबर रोजी कर्नाटक टीईटी पार पडली. बेळगाव शहरातील 29 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात आले. सकाळच्या सत्रात पहिली ती पाचवीसाठी तर दुपारच्या सत्रात सहावी ते आठवीसाठी परीक्षा घेण्यात आली. 10 नोव्हेंबर रोजी परीक्षेची उत्तरसूची परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आली. उत्तरसूचीतील उत्तरांवर 17 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्यात आले.
यावर्षी झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यातच शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी पुढीलवर्षी पुन्हा शिक्षक भरती होणार असल्याचे संकेत दिले असल्याने परीक्षार्थी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी परिश्रम घेत होते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 6 हजार 201 परीक्षार्थींपैकी 5 हजार 686 परीक्षार्थींनी टीईटी दिली होती.
टीईटीचा निकाल लवकर लागावा यासाठी परीक्षा मंडळाने मेहनत घेतली. या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिल्यामुळे परीक्षार्थींची धाकधूक वाढली आहे.