ओमप्रकाश राजभर यांचे अजब आश्वासन
उत्तरप्रदेशात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष स्वतःचे घोषणापत्र सादर करत आहेत. तर राजकीय नेते अजब आश्वासने देताना दिसून येत आहेत. वाराणसीत बोलताना सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी जनतेला अजब आश्वासन दिले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
रेल्वेत 70 जागांवर 300 हून अधिक जण प्रवास करतात आणि रेल्वेकडून कुठलाच दंड आकारला जात नाही. तसेच 9 आसनी जीपमधून देखील 22 जण प्रवास करतात, त्यावरही दंड आकारला जात नाही. याचमुळे बाइकवरून तीन जणांनी प्रवास केल्यास दंड का ? सर्वसामान्यंना का त्रास दिला जातो असे राजभर यांनी म्हटले आहे.
राज्यात सरकार आल्यास बाइकवरून तीन जण प्रवास करू शकतील. याकरता त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार नाही. भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यानंतर तिसरा ओमप्रकाश यांचा मुख्यमंत्री योगींना विसर पडला आहे. ओमप्रकाश हा अणुबॉम्ब असून आगामी 10 मार्च रोजी भाजपला सत्तेतून बाहेर करत अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रिपद मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले.