पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय तटरक्षक दलाचा 45 वा वर्धापन दिन सोमवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देताना तटरक्षक दलाच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबींयाप्रती आदर व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्यामुळे आपल्या देशाच्या सागरी सीमा सुरक्षित असून त्यांच्या कामगिरीबाबत गर्व वाटत असल्याचे ट्विटरवर नमूद केले आहे.
तर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनीही तटरक्षक दलाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतीय तटरक्षक दल एक सतर्क आणि साहसी कामगिरी नोंदवणारे दल असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले आहे. भारतीय सागरी सीमांच्या सुरक्षामध्ये या दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली असून त्यांच्या कार्याला आपण सलाम करत असल्याचेही राजनाथसिंह यांनी नमूद केले आहे.