- चिमुकल्यांसाठी विशेष कोव्हिड सेंटर
ऑनलाईन टीम / मुंबई :
अजूनही कोरोना संकट टळलेले नाही. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका समोर आहे आणि तो आपल्याला टाळायचा आहे. मात्र, गर्दी वाढत राहिली तर तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असे सांगतानाच राज्यात ऑक्सजिनचा तुटवडा निर्माण झाला तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला.
मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. या सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झाले आहे. तिसऱया लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, आता सुद्धा मी गर्दी बघितली. ही गर्दी योग्य नाही. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. कोणत्याही राजकीय स्वार्थ किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो की, आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असे काही करू नका, गर्दी टाळा असे आवहन करत विरोधकांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, खरंच लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावणी दिली, भडकवले तरी त्यांच्या चिथावणीला दाद देऊ नका, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.