अफगाणिस्तानने भारताला केले सतर्क
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आता स्वतःचा तळ पाकिस्तानातून हटवत अफगाणिस्तानात निर्माण करत असल्याचे म्हणत अफगाणिस्तान सरकारने भारताला सतर्क केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या निम्म्याहून अधिक भूभागावर कब्जा केला असताना या घडामोडी घडत आहेत.
अफगाण अधिकाऱयांनी यासंबंधी भारताला माहिती दिली आहे. यात विशेषकरून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचा उल्लेख आहे. पाकिस्तान सर्व दहशतवादी गटांना उत्तर आणि दक्षिण वजीरिस्तानातून हटवून अफगाणिस्तानात पाठवू पाहत आहे. या कृत्याद्वारे पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची धडपड करत आहे.
तालिबानशी एलईटीचे संबंध
मागील महिन्यातच 10 हजार दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून अफगाणिस्तानात प्रवेश केला असल्याचे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी मागील महिन्यात सांगितले होते. विशेष बाब म्हणजे गनी यांनी हे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरच उझ्बेकिस्तानात केले होते. तालिबानचे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांसोबत संबंध असल्याचे गनी यांनी सांगितले होते. अफगाणिस्तानात मारले गेलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी ओळखपत्रे मिळाली आहेत. इतकेच नव्हे तर तालिबानी दहशतवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.