तुडये : तिलारी नदीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना हाजगोळी (ता. चंदगड) येथे रविवारी सायंकाळी घडली. सुशांत शेट्टी (वय 28) महावीरनगर-उद्यमबाग बेळगाव असे मृत युवकाचे नाव आहे. तो बेंगळूर येथे नोकरीला होता.
सुशांत आपल्या मित्रपरिवारासह हाजगोळी येथील चाळोबा टेकडी परिसरात पार्टीसाठी आला होता. जेवणानंतर सर्वजण नदीच्या पाण्यात उतरले होते. मात्र सुशांत हा या परिसरातील धोकादायक असलेल्या नदी पात्रातील पाण्यात गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच चंदगडचे उपनिरीक्षक पवार, हवालदार अमोल पाटील, आनंदराव देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बेळगावहून अग्निशमन दलाची गाडी मागविण्यात आली असून सोमवारी सकाळी मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.