‘मोदी-शहा’ मॉडेल वाटत असल्याचा दावा
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात तृणमूल काँग्रेस हा गोव्यासाठी ममता मॉडेल नव्हे तर मोदी-शहा मॉडेलसारखा वाटत आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. लुईझीन फालेरो यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नुवे मतदारसंघात आता काँग्रेस नवा चेहरा शोधणार, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
तृणमूल काँग्रेसचा गोव्यात प्रवेश आणि निवडणूक रिंगणात उतरण्यासंबंधी प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी वरीलप्रकारे वक्तव्य केले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात प्रवेश करण्यामागे तृणमुलचा हेतू संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपाध्यक्ष आल्तीन गोम्स, ज्यो डायस, एल्वीस गोम्स, वरद म्हार्दोळकर आणि इतरांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणूक तीन-चार महिन्यांवर आलेली असताना अशाप्रकारे कोणताही नवा पक्ष एखाद्या राज्यात प्रवेश करत नाही. त्यामुळेच तृणमुलच्या गोवा प्रवेशासंबंधी संशयास बळकटी मिळते. हा प्रवेश ’ममता मॉडेल’ नव्हे तर ’मोदी-शहा मॉडेल’च वाटतो, असे ते म्हणाले.
निवडणूक तोंडावर आलेली असताना एखाद्या पक्षास सर्व आमदार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गरज असते. परंतु अशा गरजेच्या वेळी फालेरो यांनी राजीनामा देणे खरोखरच घातकीपणाचे कृत्य ठरले आहे. गेल्या काही वर्षांपासून फालेरो यांनी पक्षासाठी कोणतेही योगदान दिले नाही. पक्षाने हाती घेतलेल्या कोणत्याही आंदोलनात ते सहभागी झाले नाहीत. त्याचबरोबर स्वतःच्या मतदारसंघातही ते लोकांपासून दूर गेले होते. आता तर अचानक राजीनामा देऊन त्यांनी मतदारांचा विश्वासघातच केला आहे. त्यामुळे नावेलीत आता नव्या चेहऱयास संधी मिळणार आहे, असे राव यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बोलताना, फालेरो यांच्या जाण्याने पक्षाला धक्का नव्हे तर पुढील कार्यासाठी नवा अनुभव, नवे बळ प्राप्त झाले आहे, असे सांगितले. भाजपसाठी प्रमुख आणि प्रखर विरोधक म्हणून काँग्रेस पुढे येत असताना आणि अशा प्रसंगी सर्वांनी एकसंधपणे काम करण्याची गरज असतानाच फालेरो यांनी राजीनामा देऊन बाजूला होणे हा त्यांचा घातकीपणा होता, असेही ते पुढे म्हणाले. अशा व्यक्तीने आता प्रामाणिकपणाचा कितीही देखावा केला तरी गोमंतकीय जनता त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि त्यांना माफही करणार नाही, असेही चोडणकर म्हणाले.
त्यावेळी बोलताना दिगंबर कामत यांनी, एक विरोधी पक्ष या नात्याने विधानसभेत लोकांचा आवाज बनून आम्ही विषय, समस्या मांडल्या. त्यातून अनेकदा सरकारवर नामुष्कीची सुद्धा परिस्थिती आणली. अशावेळी आज जेव्हा आम्ही जनतेच्या दारी कौल मागण्यासाठी जाणार होतो, त्याचवेळी फालेरो यांनी राजीनामा देऊन पक्षापासून दूर जाणे ही अत्यंत दुःखद अशी घटना असल्याचे सांगितले.