खरे सांगायचे तर ‘ते दिवस’ मीही पाहिले नाहीत. काही सुटे प्रसंग मात्र आठवतात की जेव्हा एखाद्या मराठी लेखकाने व्यापक समस्येवर, राजकीय घटनेवर भूमिका घेतली आणि महाराष्ट्राने ती मान्य केली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हा मी अवघा पाच वर्षांचा होतो. थोडा मोठा होऊन हायस्कुलात गेलो तेव्हा ते आचार्य अत्र्यांचे अगदी शेवटचे दिवस होते. त्यांची दोनच व्याख्याने प्रत्यक्ष ऐकायला मिळाली. एक आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले आणि दुसरे अगदी छोटेखानी व्याख्यान झाले. स्थळ होते बालगंधर्व चौक. त्या वेळेस बालगंधर्व रंगमंदिर नव्हते. रंगमंदिर व्हावे अशी पुलंनी मागणी केली होती. आधी पुलंचे व्याख्यान झाले होते आणि अत्र्यांनी समारोप केला होता.
पुलंनी रंगमंदिर व्हावे ही भूमिका घेतली आणि काही लोकांच्या विरोधाला तोंड देऊन ती पूर्णत्वाला नेली. आणीबाणीत दुर्गा भागवत यांनी भूमिका घेतली होती. पण लगेच तिचा परिणाम जाणवला नाही. आणीबाणी उठल्यावर पुलंसह अनेक लेखकांनी जाहीर भाषणात भूमिका घेतलेली पाहिली. ती भाषणे ऐकली. त्यांचा परिणाम झालेला पाहिला. त्यानंतर सगळय़ा साहित्यिकांनी मिळून सरकारला विरोध करताना मुंबईत समांतर साहित्य संमेलन आयोजित केलेले पाहिले. पुढच्या काळात विविध चळवळी, हिंसक आंदोलने वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवरच वाचली आणि पाहिली. पण एखाद्या मराठी लेखकाने त्यांना दिशा देण्याचा किंवा त्यांची दिशा बदलण्याचा पराक्रम केलेला पाहिला नाही.
विसाव्या शतकात देशात न भूतो न भविष्यति अशी प्लेगची साथ येऊन गेली. तसे आपल्या शतकाने कोरोनाचे संकट पाहिले. प्लेगने आणि कोरोनाने घेतलेले बळी यांची तुलना झालेली नाही. पण कोरोनाचे संकट महाभयंकर आहे. तो विषाणू थोडा मागे जातो, आपण बेसावध झालो की पुढे येतो असा जीवघेणा खेळ चालू आहे.
पण स्वच्छता पाळा, स्पर्श टाळा, मुखपट्टी वापरा या सोप्या गोष्टी सांगण्यासाठी, सार्वजनिक उत्सव करावेत की नाही, वारीला जावे की नाही हे सांगण्यासाठी कोणी पुढे का येत नाहीत? एरवी वर्षभर लिहिणारे, बोलणारे सेलिब्रिटी, मोठय़ा लेखकांचा-संतांचा वारसा सांगणारे आज का पुढे येत नाहीत? त्यांनी समाजाला दिशा द्यावी असे ते दिवस गेले का? कुठे गेले?