पाकिस्तानी सैन्य हाय अलर्टवर : राजकीय संकटादरम्यान इम्रान सरकारचा नवा बागुलबुवा शक्य
इस्लामाबाद/ वृत्तसंस्था
दहशतवादाचा पाठिराखा असलेला पाकिस्तानच दोन दिवसांपासून दहशतीत आहे. भारत मोठा हल्ला करणार असल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमाने सातत्याने देत आहेत. याचमुळे पाकिस्तानी सैन्य हायअलर्टवर आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. या आगळीकीच्या विरोधात भारतीय सैन्याने बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले आहेत.
भारतीय सैन्य कुठल्याही क्षणी पाकिस्तानच्या विरोधात एक मोठी मोहीम राबवू शकते असा दावा द न्यूजने पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱयांच्या दाखल्याने दिला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत सैन्यकारवाई करू शकतो असे वृत्तात म्हटले गेले आहे.
भारत सर्जिकल स्ट्राइकसारख्या कारवाईला मूर्त रुप देण्याची तयारी करत असल्याचे प्रसारमाध्यमाकडून सांगण्यात आले आहे. 2016 मध्ये उरी येथील सैन्यतळावरील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक घडवून आणला होता. तर मागील वर्षी पुलवामामधील आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक घडवून आणत पाकिस्तानला मोठा दणका दिला होता.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न?
पाकिस्तानात भारत नावाचे ‘चुर्ण’ सर्वाधिक विकले जाते असे उद्गार इम्रान खान सरकारमधील मंत्री फिरदौस अवान यांनीच काढले आहेत. पाकिस्तानातील विरोधी पक्षांची आघाडी रविवारी लाहोरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत विरोधी पक्षाचे सर्व खासदार तसेच आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या घडामोडींमुळे इम्रान सरकारवर प्रचंड दबाव आला आहे. इम्रान सरकार वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य भारताच्या हल्ल्याची भीती फैलावत असल्याचे मानले जात आहे.
इम्रान खान- सैन्यप्रमुख बाजवा यांना आगळीक पडली महागात
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱया पाकिस्तानला दुस्साहस चांगलेच महागात पडले आहे. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले आहेत.
भारत सतर्क
पाकिस्तान सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानच्या लाँचपॅड्सवर मोठय़ा संख्येत दहशतवादी एकवटल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराच्या आडून हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु भारतीय सैन्याच्या दक्षतेमुळे हे दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नावेळीच मारले जात आहेत.