लाल किल्ल्यापासून विधानसभेपर्यंत बांधलेले प्राचीन भुयार सापडले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मेट्रो प्रकल्प आणि भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या दोन प्रकल्पांच्या निमित्ताने दिल्लीत अनेक ठिकाणी जमिनीखाली खोदकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामकाजादरम्यान ब्रिटिशकाळात लाल किल्ला ते दिल्ली विधानसभेपर्यंत बांधलेल्या गुप्त भुयारी मार्गाचा शोध लागला आहे. हे भुयार प्राचीन काळातील असून ब्रिटिशकाळात इंग्रज या भुयाराचा वापर करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे भुयार सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजधानी नवी दिल्ली नेहमी राजकारणामुळे चर्चेत असते. मात्र आता गुप्त भुयाराचा शोध लागल्यामुळे त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. दिल्ली विधानसभेत असलेले हे गुप्त भुयार थेट लाल किल्ल्यापर्यंत जाते. इंग्रजाच्या राजवटीत स्वातंत्र्यसेनानींना आणण्यासाठी ब्रिटीश सरकारकडून याचा वापर करण्यात येत होता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण 1993 मध्ये आमदार झाल्यावर दिल्ली विधानसभेमध्ये गुप्त भुयार असून ते लाल किल्ल्यापर्यंत जात असल्याचे सांगण्यात येत होते. आपण त्याबाबतचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही. आता आम्हाला या भुयाराचे उगमस्थान सापडले असून पुढे खोदकाम करण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहालय विकसित करण्याची योजना
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने फाशीच्या कक्षाची पाहणी करण्यात आली. हे काम सुरू असताना याच कक्षातून एक भुयारी मार्ग जात असल्याचे लक्षात आले. हा भुयारी मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला जाणार असला तरी फाशीचा कक्ष पर्यटकांसाठी खुला करण्याचा विचार सुरू आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याचा इतिहास जागविणारे एक संग्रहालय विकसित करण्याची योजना आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फाशीच्या कक्षाचे स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास सांगणाऱया संग्रहालयात रुपांतर केले जाणार आहे.
फाशी देण्यासाठी स्वतंत्र कक्ष
इंग्रजांच्या काळात फाशीच्या कक्षातून जाणाऱया भुयारी मार्गाचा वापर होत होता. एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला फाशी दिल्यावर त्याचे पार्थिव बघून नागरिकांनी आंदोलन करू नये म्हणून भुयारी मार्गाचा वापर केला जात होता. या मार्गाने पार्थिव लाल किल्ला परिसरात आणायचे आणि तिथून सुरक्षितरित्या पुढे नेले जायचे. तसेच काही वेळा शिक्षा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकाला बंदोबस्तात भुयारी मार्गाने लाल किल्ला परिसरात आणले जात असे. तिथून त्याची रवानगी थेट तुरुंगात केली जाई, असे तर्कवितर्क सध्या व्यक्त केले जात आहेत.
इंग्रजांनी कोलकाता येथून राजधानी 1912 मध्ये दिल्लीत आणली. राजधानीच्या स्थलांतरानंतर सुरुवातीची काही वर्षे दिल्लीत एक महत्त्वाची सरकारी इमारत ज्या भागात होती त्याच भागात 1926 मध्ये एक कोर्ट आणि फाशी देण्याचा कक्ष उभारण्याचा निर्णय झाला. भारताला स्वातंत्र्य देण्याआधी इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना दिल्लीच्या ज्या कक्षात फाशी दिली तोच हा कक्ष आजही दिल्ली विधानसभेच्या परिसरात आहे. इंग्रजांनी देश सोडल्यानंतर हा फाशीचा कक्ष बंद करण्यात आला. पुढे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभेची स्थापना करण्याचा निर्णय झाला. ही विधानसभा याच भागात सज्ज झाली. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना जिथे इंग्रजांनी फाशी दिली तो कक्ष कायमचा बंद करण्यात आला.