ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची अर्थव्यवस्था आता मोठ्या प्रमाणात सावरत आहे, तसेच देशभरात रेकॉर्ड ब्रेक जीएसटीचा परतावा झाला आहे. यासोबतच गुंतवणुकीत ही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे. तसेच विदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसात अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे त्या म्हणाल्या, गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी वीजेचा वापर 12 टक्के आणि जीएसटीचा परतावा 10 टक्क्यांनी वाढला आहे. यासोबतच देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण 10 लाखांवरून 4.89 लाख इतके कमी झाले आहे. त्यासोबतच मृत्यू दरात देखील मोठ्या प्रमाणात घट होऊन सद्य स्थितीत हे प्रमाण 1.47 टक्के इतके आहे.
- कोट्यवधी शेतकऱ्यांनी घेतला किसान क्रेडिट कार्डचा लाभ
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत 68 कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य देण्यात आले आहे. मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाही फायदा झाला. आतापर्यंत 1.43 लाखां पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्डे देण्यात आली आहेत. शेतकर्यांसाठी मोठी पाऊले उचलण्यात आली. किसान क्रेडिट कार्डसाठी 183.14 लाख अर्ज मिळाले होते. यापैकी 157.44 लाख पात्र शेतकऱ्यांना निवडण्यात आले. दुसर्या टप्प्यात 143,262 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले गेले. तर रब्बी हंगामासाठी 25 हजार कोटी वितरित करण्यात आले आहेत.
- वन नेशन वन रेशन कार्ड सप्टेंबरपासून सुरु
01 सप्टेंबर 2020 पासून 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यात आले आहे. याचा 68.6 कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
तसेच स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीसाठी एक पोर्टल देखील बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यासाठी श्रम मंत्रालयाचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.