प्रतिनिधी / मसुरे:
नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो. नवदुर्गांचा महिमा अगाध आहे. त्यासाठी दरवर्षी नवरात्री उत्सव आपण करत असतो. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कोकणातील आपआपल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱया नऊ रणरागिणीच्या कार्याला वेगळय़ा नजरेने बघत, त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी नऊ भागात व्हीडीओ सिरीज करण्यात आली आहे. त्याचे दिग्दर्शन केंद्र सरकारचा बालश्री पुरस्कार प्राप्त युवा दिग्दर्शक ‘सुमीत पाटील’ व ‘किशोर नाईक’ यांनी सांभाळले आहे.
महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावर भर देऊन या विशेष भागांसाठी काम करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम हा मराठी सोबतच इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील असामान्य, सबल स्त्रियाबद्दल माहिती पूर्ण जगापर्यंत पोहोचेल, हे निश्चितच. स्त्रियांना देवी मानल्या जाणाऱया आपल्या समाजातील स्त्रिया व त्या करीत असलेल्या त्यांच्या ‘कामाचा गौरव’ आणि त्यांच्या ‘कर्तुत्वाचा जागर’ या मालिकेत करण्यात आला आहे. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरुपात, नऊ वेगवेगळ्य़ा भागात दाखविण्यात येणार आहेत.
या उपक्रमात प्रामुख्याने संगीत शिक्षिका ‘योगिता तांबे’ या निसर्गातून होणारा नाद आणि त्यांला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करीत आहे. विशेष म्हणजे त्या 70 हून अधिक पारंपरिक वाद्य वाजवतात. गड-किल्ले सर करणाऱया सुवर्ण वायंगणकर गड-किल्ले संवर्धनासाठी आणि त्याच सोबत नववारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती सुद्धा जपत आहेत. ‘माया शृंगारे’ या आपल्या शेतात रानभाज्या जगवतात आणि त्याच संगोपन करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरुपी रानभाज्या मोफत देतात. सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱया आणि एक स्त्राr असून दशक्रिया विधी करणाऱया कसाल येथील श्रद्धा कदम या समाजसेवेचे कार्य करीत आहेत.
निसर्ग हाच आपला कॅनव्हास समजून निसर्गातून उपलब्ध झालेल्या साधनांचा वापर करून दगडांचे चित्रण करणाऱया माणगाव येथील ‘श्रुतिका पालकर’ या निसर्गाला देव मानून आपली कला सादर करतात. आपल्या रुचकर हाताने भुकेलेल्यांची भूक भागवणाऱया कुडाळ येथील 84 वर्षाच्या नानी, म्हणजे ’नंदा गावडे’ ‘अन्नपूर्णा’ म्हणून ओळखल्या जातात.
महाराष्ट्रातील फुगडी हा खेळ मनोरंजन आणि शारीरिक जडण-घडणीसाठी खेळल्या जाणाऱया आणि त्यातून आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱया ‘आरती परब’. आपल्या आयुष्याची कळ सोसत प्रेक्षकांना आदिवासी कला प्रकार ‘कळसुत्री’ आणि ‘चित्रकथी’ रुपातील बाहुल्यांचे खेळ करून मनोरंजन, समाज प्रबोधन आणि आपल्या ‘ठाकर’ वारसा जपणाऱया ‘तनुश्री गंगावणे’. त्याचप्रमाणे आपल्या प्रेमाचा जिव्हाळा कायम ठेवत वृद्धाश्रम चालवणाऱया आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हेच मूल्य अंगी बाळगून जगणाऱया ‘श्रेया बिर्जे’ या नवदुर्गांच्या कार्याला या व्हीडीओ सिरीजच्या माध्यमातून सलाम करण्यात आला आहे.
यातील विशेष बाब म्हणजे या सगळय़ा स्त्रियांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी व्हीडीओसाठी आपला आवाज दिला आहे. त्यात दीप्ती भागवत, स्पृहा जोशी, तन्वी पालव, ऋतुजा बागवे, सुरुची आडारकर, नयना आपटे, अश्विनी कासार, विमल म्हात्रे चिन्मयी राघवन यांच्या समावेश आहे. छायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव यांनी सांभाळले आहे. लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. या कार्यात संकेत कुडाळकर, साक्षी खाडय़े, धीरज कादवडकर, मंगल राणे, अभिषेक तेंडुलकर, भरत शिंदे यांनी विशेष सहकार्य केले आहे. ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेमार्फत आणि ‘प्रेम मी मीडिया’ यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून हा एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. या अनोख्या आगळय़ा-वेगळय़ा उपक्रमाची दखल टाटा-पॉवरच्या ‘सहेली’ ग्रुपकडूनही घेण्यात आली आहे, अशी महिती कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी दिली.