राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
एमएच 66 या महामार्गाच्या निकृष्ट झालेल्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शासन दरबारी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तरी याप्रकरणी सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले आहे. यावेळी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, शहराध्यक्ष संदेश मयेकर, अजय जाधव, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.
सदर महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. काही ठिकाणी काँक्रिटला भेगा पडल्या आहेत. रस्ते, साईडपट्टी खचलेली आहे. भराव वाहून गेला आहे. कणकवलीमध्ये एस. एम. हायस्कूल येथे ब्रीजचा भाग दोनवेळा कोसळला. या साऱयाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका उद्भवू शकतो. तसेच चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या साऱयाबाबत प्रशासन व ठेकेदाराचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. तरी याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.