वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 साली होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेकरिता भारताच्या अव्वल नेमबाजपटूंसाठी येथे आयोजित केलेले सक्तीचे प्रशिक्षण सराव शिबिर कोरोना महामारीच्या भीतीमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. हे शिबिर शनिवारपासून सुरू केले जाणार होते.
येथील डॉ. कर्नि सिंग नेमबाजी रेंजमध्ये सदर शिबिर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या नेमबाजांच्या खास गटासाठी सक्तीचे होते. पण या नेमबाजी संकुलातील एका प्रशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याने सदर सराव शिबिर लांबणीवर टाकण्याचा निर्णय अखिल भारतीय रायफल संघटनेने घेतल्याची माहिती या संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली.
दिल्लीमध्ये आतापर्यंत सुमारे किमान एक लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रसार आणखी वाढत असल्याचे दिसून आले आहे. तथापि, सरावापेक्षा नेमबाजांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणे गरजेचे असल्याने हे शिबिर लांबणीवर टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला. पुढील आठवडय़ापर्यंत कोरोना परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच या शिबिराच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाईल. ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ात कदाचित कोरोना परिस्थिती आटोक्मयात आली तर हे शिबिर होईल. पण सध्याच्या परिस्थितीत या शिबिरावर साशंकतेचे सावट पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारताचे अव्वल नेमबाज संजीव रजपूत, मनू भाकर, अनिष बनवाला, शिराज शेख आणि मिराज अहमद खान हे डॉ. कर्नि सिंग शूटिंग रेंजमध्ये विविध सत्रामध्ये नेमबाजीचा सराव करीत होते. दिल्ली आणि हरियाणात स्थायिक असलेले नेमबाज या ठिकाणी काही कालावधीसाठी नेमबाजीचा सराव करत होते. त्यावेळी कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन केले जात असे. भाकर आणि रजपूत हे दोन नेमबाज टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. बनवालाला या स्पर्धेत संधी मिळण्यासाठी आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे.
या नेमबाज क्रीडा संकुलात गुरुवारी एका महिला नेमबाज प्रशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱयाने दिली होती. दरम्यान, ही महिला प्रशिक्षक सराव करणाऱया कोणत्याही नेमबाजाच्या संपर्कात आली नसल्याचे सांगण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताच्या पंधरा नेमबाजांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असून आतापर्यंत सुमारे 16 लाख लोकांना याची लागण झाली असून किमान 35 हजार लोक बळी पडले आहेत.