जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे; त्यानुसारच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये निर्बंध घालावेत. हे घालत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. सध्या न्यायालयाने केवळ सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर हिजाब घालण्यास निर्बंध घातले आहेत. मात्र त्याचा इतर महाविद्यालये तसेच शाळांमध्ये दुरुपयोग करू नये, न्यायालयाचा अवमान करू नये, असे निवेदन वकील ह्यूमन राईट्स फोरमच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मी स्वतः महाविद्यालयांना भेट देऊन तेथील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांना सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनीच पालन करणे गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येकाने याचा सारासार विचार करून सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. त्यावर निवेदन देण्यास आलेल्या वकिलांनीही आम्ही निश्चितच सहकार्य करू; मात्र यामध्ये कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ऍड. अन्वरअली नदाफ, ऍड. एम. एम. जमादार, ऍड. वकार शहापुरे, ऍड. सलमान कमलापुरे, ऍड. अल्ताफ शेख, ऍड. इरफान बयाळ यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.