प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा सोमवार दि. 21 पासून अनलॉक म्हणून जाहीर करण्यात आला. त्यामुळे बसही सुरू करण्यात आल्या आहेत. बस सुरू राहिल्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी पक्षकारांनी बेळगावात हजेरी लावली. मात्र, न्यायालयीन कामकाज मर्यादितच सुरू आहे. त्यामुळे अनेक पक्षकारांना न्यायालयासमोर ताटकळत थांबावे लागत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे न्यायालयाकडे पक्षकारांना येण्यास जमले नव्हते. मात्र, सोमवारी अनलॉक झाल्यामुळे बस सुरू झाल्या. त्यामुळे अनेक पक्षकार न्यायालयाकडे येऊन वकिलांशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, न्यायालयाच्या आवारात अजूनही प्रवेशावर बंदी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारासमोरच पक्षकारांना ताटकळत थांबावे लागले. न्यायालयाच्या कामकाजावर अजूनही बरेच निर्बंध आहेत. पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात झाली नाही. ऑनलाईनच्या माध्यमातून काम सुरू आहे. दिवाणी न्यायालयांना उन्हाळी सुटी होती. आता नव्यानेच कामे सुरू होणार आहेत. अनलॉक झाल्यामुळे मोठय़ा आशेने अनेक जण आले होते. मात्र, न्यायालयीन कामकाजावर निर्बंध असल्यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले.