नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांकडून देखील वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. देशात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या वर गेली आहे. महागाईची अशी स्थिती असताना इंधन दरवाढीवरून भाजपच्या प्रवक्त्यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी निवडूण आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्ली भाजप प्रवक्त्या सारिका जैन यांनी हे वक्तव्य केले आहे.
सारिका जैन यांनी शुक्रवारी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. सारिका जैन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ज्यांना असे वाटते की पंतप्रधान कांदा, टोमॅटो, कांदे आणि पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आले आहेत त्यांनी दूर रहावे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले आहेत. ते अयोध्येत राम मंदिर तयार करण्यासाठी, लाखो खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि मुस्लिम बहिणींना तिहेरी तलाकातून मुक्त करण्यासाठी आले आहेत, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सात वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील बर्याच भागात ३५ विमानतळे बांधण्यासाठी, अनेक एम्स रुग्णालये बांधण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी, प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी, प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आले आहेत. देशातील जनतेने त्यांची ही कामे पाहिली पाहिजेत आणि समजून घेतलं पाहिजे की, या विकासाशी संबंधित कामांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे, असे देखील सारिका जैन यावेळी म्हणाल्या.