कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पाणीसाठय़ात दोन टीएमसीची वाढ
प्रतिनिधी/ सातारा/नवारस्ता
गेल्या 24 तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ सुरू झाली आहे. चोवीस तासांत तब्बल दोन टीएमसी पाण्याची वाढ होऊन धरणातील पाणीसाठा 55.07 टीएमसी वर पोचला आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत धरणात प्रतिसेकंद 33 हजार 912 क्यूसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रातही रविवारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवार सकाळपासून तर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ही आवक प्रतिसेकंद 33हजार 912 क्यूसेक इतकी झाली आहे. परिणामी 24 तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात तब्बल दोन टीएमसी वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारअखेर धरणातील पाणीसाठा 55.07 टीएमसी झाला आहे.
दरम्यान, आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप 50 टीएमसी पाण्याची गरज आहे. मंगळवारी दिवसभर कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यातील कोयना, मोरणा आणि केरा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
शेतकरी वर्ग सुखावला- भात लावणीला वेग
मागील दोन ते तीन दिवसात जिल्हय़ातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरणीला पुन्हा गती आली आहे. प्रतिवर्षी बेंदुर सण जवळ आला की पावसाचे प्रमाण ही वाढते यंदा ही काहीशी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या आगमनाने मात्र बळीराजा चांगलाच सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजांवर दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने पश्चिम भागात भात लावणीला वेग आला आहे.
आतापर्यंत सरासरी 100 मि.मी. पावसाची नोंद
जिह्यात गेल्या 24 तासात मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 9.2 मि. मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 100 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात काल सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय माहिती नुसार एकूण पावसाची आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी., सातारा 7.5 (68.4) मि. मी., जावळी 16.8(107.8) मि.मी., पाटण 19.1 (122.5) मि.मी., कराड 7.4(61.0) मि.मी., कोरेगाव 3.1 (75.0) मि.मी., खटाव 2.6 (38.2) मि.मी., माण 1.6 (114.7) मि.मी., फलटण- 0.5 (64.7) मि.मी., खंडाळा 1.1 (42.3) मि.मी., वाई 6.9 (102.1) मि.मी., महाबळेश्वर 56.1 (553.7) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने ही येत्या काही दिवसात दमदार पावसाच्या आगमनाचा अंदाज वर्तविला आहे. त्यापुर्वीच जिल्हय़ात पावसाने एंट्री केल्याने नदी, नाले, धरणातील पाण्याची पातळी ही काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या वरूण राजाने घेतलेली ही हजेरी आणखीन यापुढे ही अशीच कायम राहण्याचा अंदाज ही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येत आहे.